मागासवर्गीय समाजातील पती-पत्नी व मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांच्या निर्घृण हत्येने पाथर्डी तालुका हादरला आहे. यातील दोघांच्या खांडोळ्या केल्याचे सांगण्यात येते. हे तीनही मृतदेह एका विहिरीत मंगळवारी सायंकाळी उशिरा आढळून आले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात ही घटना घडली आहे. येथील संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), त्यांची पत्नी जयश्री (वय ३८) आणि मुलगा सुनील (वय १८) या तिघांची येथे अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पाथर्डी शहरापसून २० किलोमीटर अंतरावर जवखेडे खालसा हे गाव असून तेथून चारपाच किलोमीटर अंतरावर जाधववस्तीवर हा प्रकार झाला. जाधव कुटुंबातील या तिघांची सोमवारी रात्रीच हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होतो. जाधववस्तीपासून जवळच आडरानात असलेल्या एका निकामी पडीक विहिरीत मंगळवारी सायंकाळी मृतदेह व शरीराचे अवयव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय जाधव हे गावात गवंडीकाम करतात. त्यांचे गावात घरही आहे. दोनच दिवसांपूर्वी ते जाधववस्तीवरील शेतात राहण्यास आले होते. त्यांचा मुलगा सुनील हा मुंबईत शिकतो. तोही काही दिवसांपूर्वीच गावी आला होता.
या तिघांच्या हत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र निर्घृण हत्येने तालुका हादरला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी येथे तातडीने भेट द्यावी अशी मागणी, सायंकाळी ग्रामस्थांनी केली.