१४ ते १६ एप्रिल दरम्यान किरात ट्रस्टतर्फे आयोजन ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मीळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले, समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ. कासवांच्या लीलांचे दर्शन याची देही याची डोळा घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावच्या कासव जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. १४ ते १६ एप्रिल २०१७ दरम्यान वायंगणीच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिलांची फलटण समुद्राकडे परतताना पाहता येईल. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवं या किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. या अंडय़ांपासून बनवलेल्या पदार्थाना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसंच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचं भक्षण होऊ नये म्हणून सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी या अंडय़ांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे जाळं बसवतात आणि ५५ ते ६० दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडलं जातं. वायंगणीच्या ग्रामस्थांनी किरात ट्रस्ट आणि लुपिन फाऊंडेशनच्या सहकार्याने भरवलेल्या या जत्रेत कासवांच्या पिल्लांच्या जन्मसोहळ्याचा आनंद लुटता येईल. याच्याबरोबरीने वायंगणी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी-कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म शो, प्राणी-पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, खाडीतील सफर, दशावतार खेळ, अस्सल मालवणी पदार्थाची मेजवानी असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने घेण्यात आले आहेत. वायंगणी ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे हे ५ वे वर्ष आहे. ३ दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क - शशांक मराठे- ९४२००७९४८९. संवर्धन कासवांचे कासवाची पाठ जेवढी कठीण असते तितकेच ते दीर्घायुषी असते. कासव शंभर वर्षांपर्यंत जगू शकते. परंतु बहुतेक कासवे आपल्या आयुष्याच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच मानवाद्वारे किंवा इतर शत्रूमार्फत विनाकारण मारली जातात. जन्मापूर्वीपासूनच सुरू होतो संघर्ष जगण्याचा मादी कासव समुद्रकिनारी एकांत ठिकाणी वाळूमध्ये खड्डा खोदून अंडी घालते. एकावेळी कमीतकमी ७० ते जास्तीतजास्त १०० पर्यंत अंडी घालते. अंडी घालताना मादी सतत अश्रू ढाळीत असते. अर्थात वेदना होतात म्हणून नव्हे, तर अनावश्यक मीठ बाहेर टाकण्यासाठी. त्यानंतर पुन्हा ती खड्डा रेतीने भरते, अंडय़ांना उष्णता मिळण्यासाठी. अंडी घातल्यानंतर मादी कासव पुन्हा समुद्रात जाते. आपली अंडी आणि त्यातून निघणारी पिल्ले यांना पुन्हा कधीच पाहात नाही. नैसर्गिकपणेच या कासवांच्या जगण्याचा दर ५० टक्केच असतो. पण माणसाची वाढलेली हाव, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी, जगभरात कासवाचे मांस आणि अंडय़ांना असलेली मागणी यामुळे वाळूतील ही अंडी सर्रास पळविण्याचे प्रकार वाढले. मांसाशिवाय कवचासाठीसुद्धा कासवांची शिकार केली जाते. साप, खेकडे, शार्क, घार, गरुड यांचाही धोका असतोच. परंतु अतिलालची प्रवृत्तीच्या माणसांमुळे कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. वायंगणीचा किनारा बनतोय भारतातील कासवांचे आणखी एक मॅटर्निटी होम अशाच प्रकारचे प्रयत्न सिंधुदुर्गात वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. गेल्या काही वर्षांत ऑलिव्ह रिडले जातीची कासवे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात अंडी घालण्यासाठी वायंगणी-वेंगुर्ले, तांबळडेग-देवगड या किनाऱ्यावर येत आहेत. वनविभागाच्या सहकार्याने सुहास आणि त्यांचे सहकारी कासवांच्या अंडय़ांची ४० ते ६० दिवस काळजी घेतात. या काळात स्वत:ची पदरमोड करून सुहास जिल्ह्य़ाचा संपूर्ण किनारा पिंजून काढतात. आपल्यापरीने त्यांची काळजी घेतात. या प्रयत्नांमुळे कासवांचा नैसर्गिक जननदर जो जेमतेम ४० ते ५० टक्के होता तो ७५ टक्क्य़ांवर जाऊन पोहोचला आहे. या कामी ग्रामस्थांच्या सहकार्याप्रमाणेच देवगड येथील प्राणीप्रेमी प्रा. दफ्तरदास यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे सुहास सांगतो. कासवाच्या प्रमुख प्रजाती ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, ग्रीन (हरित कासव), लेदर बँक अशा प्रकारांपैकी ऑलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ कासवेच इथे अंडी घालायला येतात, असे निरीक्षण आहे. ग्रीन कासव आणि हॉर्सबिलने एक-दोनदाच दर्शन दिले आहे.