नाताळाचा सण आणि सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्य़ात पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले आहेत. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि माथेरान सज्ज झाले असून या निमित्ताने ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख पर्यटन केंद्रावर या विकेंडला हाऊस फुल बुकिंग झाले आहे. सरत्या वर्षांची संध्याकाळ रुपेरी वाळु, निळाशार समुद्र आणि फेसाळत्या लाटा यांच्या सान्निध्यात व्हावी यासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, नागाव, मुरुड, काशिद, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धनसह माथेरानमध्ये शंभर टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. मुरुड, काशिद आणि अलिबागसारख्या शहरांमध्ये गेल्या चार दिवसात पंधरा ते वीस हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. तर पुढील तीन दिवसांत या ठिकाणी २० ते २५ हजार पर्यटक दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी ठिकठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि न्यू ईअर पार्टीजचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांकडूनही ऑर्केस्ट्रा, गाला डान्स, डीजे आणि डिस्को थेकच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तर मुरुड नगर पालिकेकडून मुरुड पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमध्ये पर्यटकांसाठी खाद्यमहोत्सवाची मेजवानी असणार आहे. मात्र यासाठी २ हजारांपासून ते १२ हजार रुपयांपर्यंतचा खर्च पर्यटकांना सोसावा लागणार आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचे विविध प्रकार, एटीव्ही राईड्स, पॅरासेलिंग, जायंट बॉल यांसारख्या साहसी खेळांची सोय ठिकठिकाणी उपलब्ध असणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मद्य विक्रीकेंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तसेच गाडीतून मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.