नव्याने नामकरण करण्यात आलेली तुतारी एक्सप्रेस आणि अत्याधुनिक सोयींनी युक्त तेजस एक्सप्रेस या दोन रेल्वे गाडय़ांचे काल रात्री येथील रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यापूर्वी दादर-सावंतवाडी मार्गावर राज्यराणी एक्सप्रेस या नावाने धावणाऱ्या गाडीचे ‘तुतारी’ असे नामकरण करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील सुपुत्र व बंडखोर वृत्तीचे कवी केशवसूत यांच्या गाजलेल्या ‘तुतारी’ या कवितेची स्मृती जागवण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या गाडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर काल संध्याकाळी सावंतवाडीहून दादरकडे रवाना झाली. रात्री साडेदहाच्या सुमारास या गाडीचे येथील रेल्वेस्थानकात आगमन झाले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विश्वस्त अरूण नेरूरकर, रमेश कीर, चिटणीस अभिजीत नांदगावकर, प्रशांत परांजपे, गजानन पाटील, शरद बोरकर इत्यादींनी या गाडीचे जोरदार स्वागत केले. भाजपाचे नगरसेवक उमेश कुलकर्णी, अॅडव्होकेट विलास पाटणे, बाळा मयेकर इत्यादी मंडळीही या प्रसंगी उपस्थित होती. या गाडीपूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईहून बहुचर्चित तेजस एक्सप्रेसचे येथील रेल्वे स्थानकात आगमन झाले. ताशी १२० किलोमीटर वेगाने मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या सुमारे साडेआठ तासात कापणाऱ्या या गाडीमध्ये वाय-फायसह विविध अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘तेजस’ चर्चेचा विषय बनली आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्यासह रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या गाडीचे फुलांच्या माळांनी स्वागत केले. पहिल्या दिवसापासूनच या गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाडीमुळे कोकण रेल्वेमार्गाच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.