महाराष्ट्रातील उद्योगांचे कर्नाटकात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुढाकार घेतला. राज्यातील उद्योजकांशी त्यांनी या प्रश्नावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पुढील सोमवारी अथवा मंगळवारी चर्चा करून वीजदर प्रश्नी मार्ग काढणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कोल्हापूर, इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव येथील उद्योजकांसह शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, भिवंडीचे शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, शिवउद्योग सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भांबे आदींचा समावेश होता. राज्यातील विजेचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत चढे आहेत. या शिवाय उद्योजकांना अन्य समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे.