ज्येष्ठ जलतज्ज्ञ, पांझरा बारमाही प्रकल्पाचे तज्ज्ञ सल्लागार तथा लेखक, विज्ञान प्रचारक अशी चतुरस्त्र ओळख असलेले मुकुंद धाराशिवकर (७०) यांचे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास येथे दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रात्री अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी धाराशिवकर यांनी लिहिलेल्या ‘अभिजीत अफलातून सागराच्या पोटातून’ या विज्ञान कादंबरीचे प्रकाशन होणार होते. धाराशिवकर हे स्थापत्य अभियंता होते. अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून ३८ वर्षे काम केल्यावर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत विज्ञानाचा प्रसार, प्रचार आणि पाणी प्रश्नाबाबत अभ्यास केला. भारतीय जलसंस्कृती मंडळ या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे ते महाराष्ट्र विभागाचे कार्यकारिणी सदस्य राहिले. विज्ञान प्रयोगिका तसेच विज्ञान संग्रहालय त्यांनी धुळ्यात स्थापन केले. बालवाडमय ते अभियांत्रिकी संशोधनापर्यंत विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांच्या नावावार तीन कादंबऱ्या आहेत.‘पाणी पाणी तुमचे आमचे’ या ग्रंथाबद्दल त्यांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख पर्यावरण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक जबाबदाऱ्या लिलया सांभाळणाऱ्या धाराशिवकर यांनी शासनाच्या मदतीसाठी पांझरा बारमाही प्रकल्पाचे मानद तांत्रिक सल्लागार म्हणून देखील काम पाहिले.