गेल्या वर्षांच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्येही वाढ
रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या वर्षांच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे.
जिल्ह्य़ातील मंडणगड आणि रत्नागिरी हे दोन तालुके वगळता अन्य सातही तालुक्यांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई प्रकर्षांने जाणवत असून या तालुक्यांमधील एकूण ४३ गावांच्या ७२ वाडय़ांना या टंचाईचा फटका बसला आहे. त्यापैकी शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर असे दोन मंत्री लाभलेल्या खेड तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी सर्वाधिक वणवण करावी लागत आहे. या तालुक्यातील १७ गावांच्या २६ वाडय़ांना पाणीटंचाईचा फटका बसला असून त्या खालोखाल चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांतील प्रत्येकी ६ गावांच्या अनुक्रमे ११ व १० वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी शासकीय आणि खासगी टँकरचा उपयोग केला जात असून त्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच पंचायत समित्यांच्या खर्चाने या टँकरवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात टँकरऐवजी उन्हाळ्यातही पुरेसे पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या विहिरी किंवा कूपनलिकांद्वारे तेथील रहिवाशांची पाण्याची गरज भागवली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ाची पावसाची वार्षिक दीर्घकालीन सरासरी सुमारे ३३०० मिलिमीटर आहे. यंदा त्यापेक्षा तब्बल सुमारे एक हजार मिलिमीटर पाऊस कमी पडला. शिवाय, दरवर्षी दिवाळीपर्यंत अधूनमधून पाऊस पडत राहतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. गेल्या मोसमात मात्र सप्टेंबरनंतर पाऊस पूर्णपणेच थांबल्याने ही पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त खाली गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जास्त तीव्र बनली आहे.
या पाश्र्वभूमीवर शासकीय पातळीवरून विविध उपायांद्वारे पाणीटंचाईचा सामना करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असले तरी पावसाळ्याला अजून किमान एक महिना शिल्लक आहे, हे लक्षात घेता ही टंचाई आणखी वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.