आज देशातील काही भागांत प्रचंड दुष्काळ पडल्याने मोठे संकट आले आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार असून भविष्यात हे संकट वाढू नये म्हणून प्रत्येकाने आपल्या गावातील पावसाचे पाणीनियोजन करून तेच पाणी पिण्यासाठी वापरावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी केले.
प्रांताधिकारी संदीप कोकडे यांनी सामाजिक जाणिवेतून दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात पवार बोलत होते. जामखेडचे तहसीलदार विजय कुलांगे हेही यावेळी उपस्थित होते.
उपस्थित कामगार तलाठी, मंडल निरीक्षक आदींना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की आपण आजही दुष्काळाबाबत गंभीर पाहीत. प्रत्येक शेतकऱ्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पिके घ्यावीत. पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब अडवण्याची गरज असून घराच्या छतावरील पाणी, तसेच वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. त्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक व्यक्ती, अधिकारी, पत्रकार आदींनी एकत्र येऊन प्रबोधन करण्याची गरज आहे. अन्यथा आज मिळणारे टँकरचे पाणीही भविष्यात मिळणार नाहीत. टँकरच पळवून नेले जातील व सरकारही काही करू शकणार नाही, अशी बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन पाण्याबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे पवार म्हणाले.