विधिमंडळ अधिवेशनाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक १३ दिवसांच्या कामकाजानंतर बुधवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत ९ मार्चपासून सुरू होणार असल्याचे दोन्ही सभागृहात जाहीर करण्यात आले. विधानसभेत एकूण ८७ तास २० मिनिटांचे कामकाज झाले तर ८ तास ४५ मिनिटे वाया गेली. कनिष्ठ सभागृहातील सदस्यांनी रोज सरासरी ६ तास ४० मिनिटे राज्यातील प्रश्नांवर व त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर चर्चा केली. तब्बल ५१६५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी ६४० प्रश्न स्वीकृत करण्यात आले तर ६८ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. विधानसभेच्या १३ बैठकी या काळात झाल्या व जास्तीत जास्त ९४.१९ टक्के तर कमीत कमी ४७.३२ टक्के सदस्यांची उपस्थिती या बैठकींना होती. विधान परिषदेत या कालावधीत १३ बैठकींमध्ये ७५.५० तासांचे कामकाज झाले. मंत्री अनुपस्थित असल्याने २३ मिनिटांचे तर इतर कारणांमुळे तब्बल २२.२० तासांचे कामकाज होऊ शकले नाही. या सभागृहात दररोज सरासरी ५ तास ५० मिनिटांचे कामकाज झाले. ८६३ तारांकित प्रश्न विचारण्यात आले त्यापैकी ५० प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. या सभागृहात ८८९ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या त्यापैकी २२७ मान्य करण्यात आल्यात तर ४६ लक्षवेधींवर सभागृहात प्रत्यक्ष चर्चा झाली. ४६ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. अल्पकालीन चर्चेसाठी ९७ सूचना मांडण्यात आल्या होत्या. सरकारी पक्षाला ११ विधेयके संमत करून घेण्यात यश आले. ८ डिसेंबरला सुरू झालेल्या या अधिवेशनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागात असलेला दुष्काळ तसेच गारपिटीचा मुद्दा सभागृहात गाजला. मराठा आरक्षण, विरोधी पक्ष नेतेपदावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील रस्सीखेच, कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन इत्यादी मुद्देदेखील या अधिवेशनादरम्यान गाजले. यानंतरचे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आता मुंबईत ९ मार्च २०१५ ला सुरू होणार आहे.