औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या पेंडेफळ येथे पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहरीमध्ये पडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. राजश्री प्रदीप पठारे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. गावाशेजारी असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी राजश्री पठारे गेल्या होत्या. गावातील पाणीपुरवठ्याची मोटार जळाल्यामुळे चार दिवसांपासून नियमित पाणी येत नव्हतं. सांडपाणी हात पंपावरून आणलं जायचं. मात्र हात पंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे गावाशेजारी असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यात येत होतं. सकाळी घरातील काम संपवून त्या पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या त्या परतल्याचं नाहीत. त्यानंतर गावातील इतर स्त्रिया पाणी आणण्यासाठी गेल्या असता त्यांना राजश्री यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. राजश्री पठारे यांचे पती गवंडी काम करतात. सकाळीचं ते शेजारच्या गावात कामासाठी गेले होते. राजश्री यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. हा प्रकार घडला तेव्हा हे दोघेहीजण घरात खेळत होते. हंडाभर पाण्यासाठी मोटर चालू बंद करायला नको म्हणून शेंदून पाणी काढण्याच्या प्रयत्नात राजश्री यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ शिऊर येथील सरकारी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून शिऊर येथे शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने त्यांचा मृतदेह वैजापुरला नेण्यात येणार आहे.