संगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..

अनिल मोहिले ऊर्फ भाई. संगीत क्षेत्रातले खरेखुरे ‘भाई’! हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीत ५० पेक्षा जास्त र्वष ज्यांनी दादागिरी केली, ते महान संगीतकार आणि संगीत संयोजक! संगीत संयोजनाबद्दल त्यांना इतक्या वर्षांत भेटलेल्या संगीतकारांबद्दल, वादकांबद्दल भाई बोलायला लागले की ऐकतच बसावंसं वाटे. ज्ञानाचा न संपणारा खजिनाच होते ते. आणि त्या खजिन्यातलं एक कांकण माझ्याही वाटय़ाला आलं आहे, हे मी माझं परमभाग्य समजतो.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”

मी एका म्युझिकल रिअ‍ॅलिटी शोचा मेंटॉर होतो तेव्हा भाई त्याचे परीक्षक होते. मधल्या विश्रामात त्यांच्याबरोबर संगीतविषयक गप्पा मारत बसणं, ही माझ्यासारख्या विद्यार्थ्यांला पर्वणीच होती. नंतरच्या काळातही मला जुन्या गाण्यांविषयी किंवा संगीतकारांविषयी माहिती हवी असली तर फोन केल्यावर भाई ती मनमोकळेपणानं पुरवीत असत. एवढंच नव्हे तर गप्पांच्या ओघात इतर अनेक गोष्टीही शिकवून जात. वास्तविक पाहता मी त्यांना खूपच ज्युनिअर होतो. पण मला संबोधताना ‘राजा’ वगैरे शब्द वापरून ते मला एकदम कम्फर्टेबल करून टाकत!  ‘संगीत’ या विषयावर लहान मुलाच्या उत्साहाने आणि अत्यंत प्रेमळ स्वरात बोलणारा हा अरेंजमेंटचा जादूगार इतर अरेंजर्सच्या कामाचं कौतुक करायलाही मागेपुढे पाहत नसे. पंचमदांचे अरेंजर मनोहारी सिंग यांना ते आपले गुरू मानत. पुढे मनोहारीदा जेव्हा भाईंच्या रेकॉर्डिंगला सॅक्सोफोन किंवा सिल्वर फ्ल्यूट वाजवायला जात, तेव्हा गुरूने शिष्याच्या मार्गदर्शनाखाली वाजवण्याचा अजब प्रकार घडत असे. मला वाटतं, फक्त संगीत क्षेत्रातच असं घडू शकतं! मनोहारीदा सॅक्स किंवा फ्ल्यूट वाजवताना त्यात प्राण ओततात असं भाईंचं म्हणणं होतं. शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘आरजू’ चित्रपटातलं ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ असो, ‘प्रोफेसर’मधलं ‘आवाज देके हमे तुम बुलाओ’ असो, किंवा पंचमदांनी संगीतबद्ध केलेली असंख्य गाणी असोत.. त्यातले मनोहारीदांनी वाजवलेले पीसेस ऐकले की धातूपासून बनलेली निर्जीव वाद्यं अक्षरश: बोलू शकतात याची प्रचीती येते.

भाईंना संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. आजोबा, वडील, काका- सगळेच संगीतातले दर्दी. त्यातून वडील हौशी संगीत शिक्षक. त्यामुळे सात वर्षांच्या अनिलला विविध वाद्यांची गोडी लागली नसती तरच नवल! पुढे शाळकरी अनिलचे ‘गंमतजम्मत’ या आकाशवाणीवरील लहान मुलांच्या सदरामधून काचतरंग, जलतरंगचे एकलवादनाचे कार्यक्रम होऊ  लागले. बारा वर्षांचा अनिल दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात व्हायोलिन शिकायला लागला आणि वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी व्हायोलिनमध्ये संगीत विशारद तर झालाच; पण तबला, पेटी, काष्टतरंग, तबलातरंग अशा इतर अनेक वाद्यांत पारंगतही झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच सी. रामचंद्र, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गजांची पाठीवर पडलेली थाप आणि आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले हा तरुण, मेहनती, हुशार, हरहुन्नरी कलाकार १९६० साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आकाशवाणीच्या नोकरीत रुजू झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या संगीत कारकीर्दीला सुरुवात झाली. (गमतीचा भाग म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेले विविध भारतीवरच्या जाहिरातींच्या मधे मधे वाजणारे फिलर्स मोहिलेंनी काचतरंगवर वाजवले आहेत.) आकाशवाणीवर वेगवेगळे गीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ आणि संगीतकार वरचेवर भेटत असल्यामुळे जडणघडणीच्या वयात अनिल मोहिलेंच्या ज्ञानात आणि अनुभवांत भर पडत गेली.. वाद्यवृंद संयोजक म्हणून आणि संगीतकार म्हणूनही!

१९६५ साली श्रीनिवास खळे नामक सुरांचा जादूगार आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीस लागला आणि त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मोहिलेंनी श्रोत्यांना अचंबित करणाऱ्या अरेंजमेंट्स केल्या. आकाशवाणीवरच्या ‘भावसरगम’ या त्याकाळी गाजलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ‘शुक्र तारा मंद वारा’ (अरुण दाते), ‘हात तुझा हातातून’ (महेंद्र कपूर), ‘सर्व सर्व विसरू दे’ (आशा भोसले) अशी एकसे एक गाणी या दोघांच्या संगीतमंथनातून बाहेर पडली. याचदरम्यान अनिल मोहिले संगीत दिग्दर्शनही करू लागले होते. त्या काळात त्यांनी अरुण पौडवाल यांच्या साथीनं संगीत दिलेलं ‘डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली’ हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं आजही आपल्या स्मरणात आहे! (योगायोग म्हणजे वरील सर्व गाणी मंगेश पाडगांवकरांच्या लेखणीतून साकारली गेली आहेत. त्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत!)

‘शुक्रतारा’ या गाण्याविषयीची भाईंची आठवण थक्क करणारी आहे. आपण अरुण दाते यांच्या आवाजात इतकी र्वष जी चाल ऐकतो आहोत, ती खळेकाकांनी लावलेली अकरावी चाल आहे, असं खळेकाकांबरोबर (गणपतीसारखे) नोटेशन लिहायला बसलेले भाई सांगायचे! खळेकाका चाल बनवायचे आणि चाल बनल्यावर ती रद्द करून पुन्हा नवीन चाल लावायचे. भाईंचं म्हणणं होतं की, आधी लावलेल्या दहा चालींमध्ये वाईट काहीच नव्हतं. त्याही एकापेक्षा एक अप्रतिमच होत्या. पण केवळ दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही, तर स्वत:चं समाधान होईपर्यंत एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणं हा खळेकाकांचा स्वभाव. त्यांचा हा गुण आजच्या कलाकारांनी घेण्यासारखा आहे. (आधीच्या दहा चाली कशा होत्या, आणि त्यांचं पुढे नेमकं काय झालं, हा प्रश्न माझ्यासारखाच तुम्हालाही भेडसावेल यात शंका नाही.)

गदिमांचे कातरवेळ चितारणारे, काळजाला भिडणारे शब्द, खळेकाकांची भीषण सुंदर पुरिया धनाश्री या रागावर आधारित चाल, लता मंगेशकर यांचा काळीज चिरत जाणारा स्वर आणि अनिल मोहिले यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीताचं कोंदण यामुळे अजरामर झालेलं, ऐकताना डोळ्यांत पाणी आणणारं गाणं म्हणजे ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ संगीतकाराने दिलेल्या चालीवर हावी न होता प्रभावी वाद्यमेळ कसा करावा, याचं उत्तम उदाहरण! खळेकाका आणि अनिल मोहिले यांनी ही किमया अनेक गाण्यांमधून साधली आहे. ‘अभंग तुकयाचे’मधील प्रत्येक गाणं याचा दाखला देतं. स्वत: संगीतकार असताना दुसऱ्या संगीतकाराच्या गाण्याला सजवायची जबाबदारी चोख पार पाडणं, हे महाकर्मकठीण काम आहे. (हे म्हणजे एका निष्णात शेफने दुसऱ्यानं बनवलेल्या डिशवर फक्त गार्निशिंग करण्यासारखं आहे!) भाईंनी अरुण पौडवालांच्या साथीने अनेक सुंदर गाणी रचलीच; पण इतर अनेक संगीतकारांच्या गाण्यांनाही चार चाँद लावले. आकाशवाणीच्या नोकरीत असतानाच हृदयनाथ मंगेशकरांनी मोहिलेंवर शांता शेळकेरचित कोळीगीते सजवायची जबाबदारी सोपवली. हेमंतकुमार व लतादीदींनी गायलेली ही कोळीगीते त्याच्या म्युझिकसकट आजही आपल्याला पाठ आहेत. याचं श्रेय शांताबाई आणि मंगेशकरांचं तर आहेच; पण भाईंचाही त्यात मोठा वाटा आहे यात शंका नाही. संगीत संयोजन करताना कमालीची कल्पकता लागते आणि ती भाईंकडे ठासून भरली होती. ‘राजा सारंगा’मध्ये नायिकेची भावना अधोरेखित करण्यासाठी कोरसच्या हमिंगचा केलेला वापर, ‘असा बेभान हा वारा’मधले वाऱ्याचा वेग प्रतीत करणारे व्हायोलिन्सचे रन्स.. उदाहरणं देईन तेवढी कमीच पडतील.

पुण्याच्या रसिक चित्र निर्मित ‘वैभव’ (१९६४) या चित्रपटातलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं ‘अबोल झालीस का’ या गाण्याचं संगीत संयोजन हा २३ वर्षीय अनिलचा पहिला अनुभव. त्यानंतर भाईंनी अनेक संगीतकारांची शेकडो गाणी सजवली. श्रीनिवास खळे, बाबुजी, दत्ता डावजेकर, राम कदम, श्रीकांत ठाकरे, यशवंत देव, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या मराठी संगीतकारांबरोबरच एस. एन. त्रिपाठी, इक्बाल कुरेशी, सलील चौधरी, एस. डी. बर्मन, खय्याम, डॉ. भूपेन हजारिका, कल्याणजी-आनंदजी, बप्पी लाहिरी, आनंद मिलिंद अशा अनेक हिंदी संगीतकारांसमवेतही त्यांनी काम केलं.

कल्याणजी-आनंदजी यांच्या एका चित्रपटासाठी आणि सीनियर बर्मनदांबरोबर ‘शर्मिली’चं पाश्र्वसंगीत करण्यासाठी त्यांना आणि अरुण पौडवाल यांना कसं पाचारण करण्यात आलं याची कहाणी मोठी रंजक आहे. तर झालं असं..

राहुल रानडे
rahul@rahulranade.com