‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील, शारीरिक हानी होईल ती वेगळीच.
शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून दोघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. अतिथंड देशात सूर्यकिरणं अंगावर न पडल्यामुळे जीवनसत्व डीची कमतरता तेथील लोकांमध्ये असते. सकाळी नऊच्या आत अंगावर सूर्यकिरणं पडावीत म्हणतात, पण तेव्हा ऊन नसते, मग हे लोक दुपारचे ऊन अंगावर घेतात.
शर्मिलाला फार अ‍ॅलर्जीज होत्या. अर्थात त्या एका दिवसात आलेल्या नव्हत्या. प्रदूषण हा एक घटक असला तरी सबंध दिवस ए.सी. लावलेल्या खोलीत बसून काम करणं, शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण, समाजात कमी वावरणं अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. घरी गेल्यावर घरच्यांबरोबर हास्यविनोद करा. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्याचे परिणाम कधी लवकर दिसतात तर कधी उशिरापण दिसतात हे नक्की. आयुष्यातील आव्हानं सहज पेलण्याकरिता, मानसिक, सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता वेळ काढून शारीरिक व्यायाम, मन प्रसन्न राहण्याकरिता छंद जोपासा. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा, असे उपाय सांगितले. शर्मिलाला ते पटलं. आचरणात आणणं अवघड असलं तरी अशक्य नाही हेही तिला माहीत होतंच. जवळच राहणाऱ्या मानसीला तिने, ‘मला मदत कर’ असं सांगितलं. तिलाही थोडे प्रश्न होते. दोघी पार्कमध्ये बसवलेल्या व्यायाम साधनांवर व्यायाम करू लागल्या. मुद्दाम काही वाचून त्यावर आठवडय़ातून एकदा तरी चर्चा करू लागल्या. एखाद्या वेळी बहीण-भावंडांना घेऊन आऊटिंग होऊ लागलं. नकळत दोघींचं मन प्रसन्न राहू लागलं. हळूहळू अ‍ॅलर्जीज कमी झाल्या. पचनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढल्या. आयुष्य आनंदी झालं. आपण एखादं महागडं वाहन विकत घेतो तेव्हा त्याचं सव्‍‌र्हिसिंग, देखभाल अगदी डोळ्यात तेल घालून करतो, तशी या टॅक्स-फ्री संपत्तीची हल्ली केली जाते.
ठरावीक वयानंतर गुडघेदुखीचा प्रॉब्लेम काहींना होतो. तसा तो शीलाला झाला. पण तिने खूप हौसेने कर्जतजवळ फार्म हाऊस घेतलं होतं. वीकएंडला तिथे जाऊन ती काम करायची. आठवडाभर ऑफिसनंतर हा प्रवास. फार्म हाऊसचं काम पूर्ण करूनच गुडघ्याकडे पाहू असं तिने ठरवलं. घरच्यांनी तिचं काही ऐकलं नाही. डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘‘वेळेवर आलात, औषधं घेऊन चार महिने संपूर्ण आराम केला तर नक्की बरं वाटेल. नाही तर रिप्लेसमेंट हा एकच उपाय शिल्लक राहील.’’ परिस्थितीचं गांभीर्य शीलाच्या लक्षात आलं.
‘चार महिन्यांच्या उपायांनंतर दुप्पट जोमाने काम करू! सर सलामत तो पगडी पचास.’ हाच विचार तिने केला. अर्थात ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा मंत्र तिला माहीत होता म्हणूनच तिला हे सुचलं, तिने त्या धनाची काळजी घेतली.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
आरोग्यम् धनसंपदा : पचवाल तर वाचाल