‘‘शास्त्राप्रमाणे आता तुमच्या आईला हे विधी करण्याचा अधिकार नाही. तेव्हा तुमच्या नातेवाईकांना देवदेवक वगैरे ठेवायला सांगावे लागेल आणि जिथे शक्य होईल तिथे आम्ही तुमच्या आईला सहभागी करून घेऊ. वाटल्यास स्टेजवर त्यांना आपण एक खुर्ची देऊन बसायला सांगू.’’ गुरुजी म्हणाले. पण माझ्या आईनेच माझ्या लग्नातले सर्व विधी करावेत अशी माझी इच्छा होती. व्हाट्सअॅप ग्रुपवर, नवरा गेल्यावर एखाद्या स्त्रीला हळदीकुंकवाला बोलवावे का नाही, या विषयावरचा एक लेख वाचण्यात आला आणि आपला समाज अजूनही कसा चुकीच्या रूढी परंपरांमध्ये बंदिस्त आहे याचा मी नुकताच घेतलेला अनुभव शब्दांतून मांडायची निकड जाणवली. त्याचे कारण ठरले, अचानक झालेले माझ्या वडिलांचे निधन! या धक्क्यातून मी आणि आई सावरायच्या आत भेटायला येणाऱ्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या प्रश्नाला आम्हाला सामोरे जावे लागले. ‘‘आता हिचे ठरलेले लग्न कसे होणार, कधी होणार?’’ काहींना माझ्या होणाऱ्या नवऱ्याने, काहींना सासूबाईंनी उत्तरही दिले, ‘‘जसे सगळे आधी ठरले होते तसेच होणार.’’ तरीही कोणाचे समाधान झाल्याचे जाणवले नाही. मुळात माझा नवरा आणि सासरचे अतिशय संतुलित विचारांचे असल्याने त्यांची ठाम साथ मला वडिलांचे अंत्यविधी करतानाही मिळाली होती. त्यांनाही कन्यादान आईच्या हातून होण्यात काहीच गैर वाटले नाही, त्यांनी गुरुजींना माझे वडील गेल्याचं तसंच आता काही विधींमध्ये त्याप्रमाणे बदल होतील असं सांगितलंही पण समोरासमोर प्रत्यक्ष भेटून गोष्टी स्पष्ट कराव्यात म्हणून मी तिथे गेल्यावर मला आलेला अनुभव आम्हा दोन्ही कुटुंबांना मनस्ताप देणारा होता. माझा त्या ‘प्रसिद्ध’ गुरुजींशी झालेला संवाद खालीलप्रमाणे - ‘‘माझी अशी इच्छा आहे की माझे लग्न माझ्या आईने लावावे. तेव्हा त्यासंदर्भात तुम्हाला विचारायला मी आले आहे, हे शक्य आहे ना?’’ ‘‘नाही.’’ ‘‘पण का?’’ ‘‘कारण शास्त्र सांगतं. आता तुमच्या आईला हे विधी करण्याचा अधिकार नाही. तेव्हा तुमच्या नातेवाईकांना देवदेवक वगैरे ठेवायला सांगावे लागेल आणि जिथे शक्य होईल तिथे आम्ही तुमच्या आईला सहभागी करून घेऊ. वाटल्यास स्टेजवर त्यांना आपण एक खुर्ची देऊन बसायला सांगू. आणि कन्यादानाचे काय कोणीही केले तरी नाव तुमच्या आईवडिलांचे आणि गोत्र तसेच आजोबा, पणजोबा असेच येणार.’’ ‘‘अहो, पण मग तेच माझी आई करेल ना!’’ ‘‘नाही. ते शक्य नाही.’’ ‘‘पण मला कोणी नातेवाईक नसते तर?’’ ‘‘मग अशा स्थितीत गुरुजींना ते करण्याचा अधिकार आहे असे शास्त्र सांगते.’’ ‘‘आश्चर्य आहे त्रयस्थ असलेल्या गुरुजींना जो अधिकार आहे तो स्वत:च्या जन्मदात्रीला नाहीये, हे असं कसं शास्त्र असू शकतं? मला नाही पटते हे!’’ ‘‘अहो, हे आता तुमच्या घरात झालं तेव्हा आठवलं, एरवी कोणाकडे असं झाल्यावर सुचलं असतं का तुम्हाला?’’ ‘‘पण मी माझ्या बाबतीत निर्णय घेऊ शकते ना! इतरांच्या बाबतीत मला तो हक्क नाही.’’ ‘‘हा सगळा वादाचा मुद्दा आहे.’’ ‘‘पण मी वाद घालायला नाही आलेय, आपली संस्कृती केवढी थोर आहे. पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय म्हणून साक्षात पांडुरंग विटेवर उभा राहिला.’’ ‘‘आम्हाला आमच्या गुरुजींनी जे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही हे सर्व विधी करतो. तुम्हाला काय हो याचे? पातक आम्हाला लागतं आणि असेच असेल तर तुम्ही तुमचा गुरुजी बघा. आम्ही तुमचे लग्न लावू शकत नाही.’’ ‘‘ठीक आहे.’’ गुरुजी ऐकायला तयार नव्हते. बरं त्यांची एकंदर अवस्था आणि दक्षिणा बघता पैशाच्या लोभापायी ते करत असावेत अशी शंका घ्यायला पण जागा नव्हती. या नंतर आम्ही लग्नाच्या केवळ एक आठवडा आधी नवे गुरुजी शोधले, अर्थातच बरेचसे गुरुजी आम्हाला शिव-शक्ती म्हणून जोडपे लागते वगैरे सांगत होते. दोन एक दिवस अनिश्चितता, मानसिक तणाव वगैरे काय काय दिव्यातून आम्ही गेलो ते आमचे आम्हालाच माहिती. शेवटी एका गुरुजींनी आम्हाला, आमच्या निर्णयाला अनुकूलता दर्शविली आणि आमचा जीव भांडय़ात पडला. दोन्हीकडचे लग्न आता नवे गुरुजी लावणार म्हणून त्यांनी आणखीन एक गुरुजी सोबतीला आणले. त्यांनाही म्हणे माझा हा निर्णय मान्य नव्हता, त्यामुळे त्या दोघांमधला ताळमेळ नीटसा जमला नाही हे आम्हाला लग्नात स्टेजवर लक्षात येत होतेच. पण तरीही कन्यादान माझ्या आईने एकटीने केले. आता कन्यादान हा विधी मला स्वत:ला मान्य नाही, परंतु ते माझ्या आईचे मी जन्माला आल्यापासूनचे भाबडे स्वप्न होते जे मुलगी म्हणून पूर्ण करणे मला कर्तव्य वाटले, म्हणून केवळ हा आटापिटा! मुळात आपल्याकडे स्त्रीला तिचा नवरा असणे किंवा नसणे यावरून जे सवाष्ण, विधवा हे बिरुद चिकटवले जाते आणि त्याचा बादरायण संबंध हळदीकुंकू लावणे, ओटी भरणे, धार्मिक विधी करणे याच्याशी लावला जातो तो का तेच मला कळत नाही. आपण सारी माणसेच असताना माणूस म्हणून आपण ‘तिचे’ अधिकार ठरवणारे कोण? आणि जन्म-मृत्यू जे अत्यंत नैसर्गिक आणि शाश्वत सत्य आहे त्यासाठी कोणा एकाला जबाबदार धरणे व शिक्षा देणे कितपत योग्य? मला आसपास मुख्यत्वे एक वृत्ती जाणवली ‘कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून त्यावर डोळ्यांना झापड बांधून विश्वास ठेवणे आणि मागून चालत राहणे.’ हे बदलायलला नको का? आपल्याला सारासार विचार करता यायला हवा. मेल्यावर श्राद्ध घालणे अनिवार्य म्हणणारे, पितृदोष वगैरे मानणारे लोक जिवंत व्यक्तीला मात्र वाट्टेल तसे वागवतात तेव्हा बाकीच्या या गोष्टींना किती अर्थ उरतो आणि खरंच अशा वेळी परमेश्वराचे अधिष्ठान तिथे असू शकेल का? माझ्यापुरतं मी उत्तर मिळवलं की, हे योग्यच होतं म्हणून मला आयत्यावेळी नवे गुरुजी मिळाले. मी आईलाही सांगितलं आहे की, तू तसंच जगायचं जसे बाबा असताना जगायचीस. बाकी कोणाला काय वाटतं याकडे लक्ष द्यायचं नाही. तसेही ते लोक म्हणजे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या गटातले. आणि हे आपलं आयुष्य आहे, आपण आपल्या जगण्याचा ताबा कोणाकडे द्यायचा नाही. माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवला. पण कोणी म्हणेल मग हे एवढं डंका पिटून जाहीर सांगण्याची गरज काय? माझा हा प्रत्यक्ष जगण्यातला अनुभव सांगण्याचा उद्देश हाच की, इतरांनाही यातून प्रेरणा मिळावी, हिंमत मिळावी आणि स्वत:च स्वत:च्या विचारांच्या मर्यादांचा पिंजरा ओलांडून त्यांना आकाशी झेप घेता यावी. स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत राहणं जेवढं गरजेचं आहे, तेवढेच कितीही संघर्ष करायला, कष्ट घ्यावे लागले तरीही त्याची उत्तरे शोधायचा अथक प्रयत्न करत राहणंही! वैभवी भिडे-आपटे - vaibhavi.sep@gmail.com