‘उद्यापासून ८.१२ ची चर्चगेट लोकल ८.०७ ला सुटेल,’ स्टेशनवर घोषणा सुरू होती. स्वप्निलने ती ऐकली आणि त्याच्या कपाळावर आठी उमटली. ‘बाप रे! म्हणजे उद्यापासून चांगलीच तारांबळ होणार! आणखी किती लवकर निघायचे? रेल्वेवाल्यांना आमच्या वेळेची काही किंमतच नाही…’ असे अनेक विचार त्याच्या मनात सुरू झाले आणि त्याचे रूपांतर हळूहळू रागात झाले. त्या धावपळीच्या कल्पनेने त्याला आत्ताच घाम फुटला. उद्या घरातून किती वाजता निघायचे, त्यासाठी कसे खूप लवकर उठावे लागेल, झोप होणार नाही इ. अनेक विचारांनी अस्वस्थ होता. नुसत्या कल्पनेनेच त्याला छातीत धडधडू लागले. श्वास गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि वाटले आपल्याला ही नोकरीच नको!

‘डिसेंबर महिना सुरू झाला. आपला या ऑफिसमधला शेवटचा महिना.’ निवृत्त होऊ घातलेल्या श्यामरावांना एकीकडे खूप वाईट वाटत होते, पण दुसरीकडे मनात एक प्रकारची उत्सुकता दाटून आली होती. आपल्या रुटीनपेक्षा काही तरी वेगळे करण्याची उत्सुकता, विश्रांती घेण्याची इच्छा, पत्नीबरोबर बाहेरगावी जाण्याच्या योजना असे सारे मनात होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी निवृत्त होण्याची मानसिक तयारी चालवली होती. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू अशा अवस्थेत, पण मनात एक समाधान घेऊन ते शेवटच्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडले.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

अश्विनीची बाळंतपणाची रजा संपून कामावर रुजू व्हायचा दिवस जवळ आला. तशी तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. ‘नकोच ती नोकरी. आपण पुरेसा वेळ दिला नाही तर आपल्या मुलीवर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? मी सगळे करताना पिचून जाईन अगदी!’ तिला झोपच लागेना. सारखे रडू येऊ लागले. नको नको ते विचार मनात यायला लागले. आपण एक आई म्हणून अयशस्वी ठरू अशी भीती वाटू लागली. ‘आपल्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला, गाडय़ा लेट असल्या तर तिला पाळणाघरातून आणणे, तिचं खाणंपिणं करणे आपल्या नवऱ्याला जमेल का? लोक आपल्याला नावे नाही ना ठेवणार? आपली नोकरी फिरतीची. कधी बाहेरगावी जायची वेळ आली तर..?’

अशी अनेक स्थित्यंतरे आपल्या आयुष्यात घडत असतात. कधी छोटे छोटे बदल घडतात, तर कधी मोठय़ा घटना घडतात. काही बदल अचानक तर काही अपेक्षित असतात. काही आकस्मिक घडतात तर काही हळूहळू होतात. कुठल्याही प्रकारचा बदल असला तरी त्याला तोंड द्यावे लागते. लहानपण संपवून किशोरावस्था प्राप्त होणे, स्त्रीच्या जीवनात गरोदरपण, बाळंतपण यांसारख्या घटना आणि हळूहळू वार्धक्याकडे वाटचाल असे अनेक बदल आपल्या जीवनात विविध टप्प्यांवर होतात. चांगल्या आणि वाईट अनेक घटना घडतात. लग्नासारखी चांगली गोष्ट हे जीवनातील एक महत्त्वाचे स्थित्यंतर, पण तेही मनावर ताण निर्माण करते. नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी नवीन ठिकाणी जाणे, बढती मिळणे, नवीन घरात राहायला जाणे अशा अनेक आनंददायी बदलांमध्येसुद्धा परिस्थितीशी जुळवून घेणे हे एक कसब ठरते. दु:खदायी घटनांना (उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी जाणे, परीक्षेत अपयश) तोंड देतानासुद्धा मनाची लवचीकता वाढवावी लागते. स्वप्निल किंवा अश्विनीसारख्या लोकांना छोटय़ा आणि मोठय़ा बदलांना सामोरे जायला त्रास होतो. भूक वा झोप कमी होते, अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होतात. उदा. अपचन, पाठदुखी, डोकेदुखी, थकवा, मनात चिंता निर्माण होते किंवा उदासपणा येतो, निराश वाटते, आत्मविश्वास हरवतो. बऱ्याच वेळा बदल स्वीकारण्याची मानसिकता नसते. परिस्थितीमध्ये काही बदल होणारच नाही, अशी खोटी समजूत मनाची करून घेतली जाते. बदलाला सामोरे जाण्याची योजना न करता जे घडले त्यावर अतिरेकी प्रतिक्रिया दिली जाते. उदा. राग, संताप. चुकीच्या किंवा अर्धवट माहितीच्या आधारे निर्णय घेतले जातात. स्थिती पूर्ववत होईल, अशी स्वत:ची समजूत घालावीशी वाटते. यातून मानसिक व्यथा व विकार उद्भवतात.

वेगवेगळ्या स्थित्यंतरांना सामोरे जाण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले तर आपण प्रगती करू शकतो.  होतो. खूप वेळा होणारा बदल आहे त्याच्यापेक्षा अधिक भयंकर आहे, असे मन म्हणते आणि आपल्याकडे या बदलाला सामोरे जाण्याची पुरेशी ताकद नाही, असे स्वत:विषयीचे चुकीचे मूल्यमापन करते. स्थित्यंतरे घडणार असे अपेक्षित धरले की, आपोआप मनाची पूर्वतयारी होते. अशा वेळी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. योग्य आहार, व्यायाम, ठरलेला दिनक्रम पार पाडणे, रिलॅक्सेशनचे तंत्र आत्मसात करणे, योगाभ्यास, पुरेशी झोप या सगळ्यातून मन ताजेतवाने होते. डायरी लिहिण्याची सवय आपल्या मनातील विचार आणि भावना व्यक्त करायला मदत करते. विचारांची दिशा अधिक सकारात्मक करण्यासाठी अशा लिखाणाचा उपयोग होतो.

परिस्थितीचे नकारात्मक मूल्यमापन (बदलीच्या ठिकाणी काम जास्तच असणार), परिस्थिती भयंकर आहे असे वाटणे (बदलीच्या ठिकाणी मला काम जमणार नाही आणि वरिष्ठ माझ्यावर नाराजच होत राहतील), ‘असेच झाले पाहिजे किंवा असेच असायला हवे’ असे वाटणे (माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत), परिस्थितीवर माझे नेहमीच नियंत्रण असले पाहिजे, असे वाटणे अशा अनेक प्रकारच्या त्रुटी विचारांमध्ये तयार होतात. त्या दूर करण्यासाठी योग्य माहिती मिळवणे, वास्तविकतेचे भान ठेवणे, विविध पद्धतीने समस्या सोडवता येते याचे भान ठेवणे अशा अनेक मार्गाचा अवलंब केल्याचा फायदा होतो.

नेहमीच कुटुंब आणि मित्र परिवार यांच्याकडून भावनिक आधार, तसेच प्रत्यक्ष मदत मिळवणे (उदा. अश्विनीने आई-वडिलांची किंवा सासू-सासऱ्यांची मदत मागणे) याचा बदलत्या परिस्थितीशी सामना करताना खूप उपयोग होतो. काही वेळेस मात्र मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. बदलाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन या गाण्यात आहे.

बदला नजरा यूँ यूँ यूँ
सारा का सारा न्यू न्यू न्यू
मैं हॅपी व्ॉपी क्यूं क्यूं क्यूूं
मैं बिझी-विझी हूँ हूँ हूँ

असे प्रत्येकाने म्हटले तर हसत हसत बदल स्वीकारणे शक्य आहे.

डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com