बॉलीवूडमधील मि. परफेक्शनिस्ट ओळख असणाऱ्या आमिर खानने त्याच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटासाठी तब्बल ९० किलो इतके वजन केले आहे. या चित्रपटात आमिर एका कुस्तीपटूची व्यक्तिरेखा साकारत असून भूमिकेची गरज म्हणून आमिरने आपले वजन वाढविले. पुढील महिन्यापासून नितेश तिवारी दिग्दर्शित करत ‘दंगल’चे चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
चित्रपटाच्या पडद्यावर एखादी भूमिका तंतोतंत साकारण्यासाठी आमिर खान नेहमीच जीवाचे रान करताना दिसतो. सुरूवातीला २२ किलो वजन वाढविल्यानंतर आमिरने पूर्णपणे शाकाहारी आहार घेण्यास सुरूवात केली. तसेच या चित्रपटासाठी आमिरने हरियाणवी भाषेचे धडेही गिरविल्याचे समजते.
तुम्ही या चित्रपटासाठी सुरू असलेली तयारी पाहू शकता. मी सध्या कुस्ती आणि हरयाणवी भाषा शिकत आहे. याशिवाय, मी पूर्णपणे शाकाहारीही झालो आहे. मी साधे अंडेदेखील खात नाही. ‘पीके’च्या चित्रीकरणाऱ्या वेळी माझे वजन ६८ किलो असल्याचे आमिरने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या  मुली गीता, बबिता आणि संगीता यांच्या जीवनावर आधारित आहे. टेलिव्हिजनवरील आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींनी उपस्थिती लावली होती.
aamirkhan-dangal