मला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती, असं ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ किताब विजेती अदिती आर्य सांगते. ५२व्या ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत २१ वर्षीय अदितीला गत वर्षीची ‘फेमिना मिस इंडिया’ कोयल राणाच्या हस्ते ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आता, अदिती ‘मिस वर्ल्ड २०१५’ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सौंदर्य स्पर्धेतील सहभागामुळे व्यक्तिमत्व सशक्त होण्यास मदत होते. तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठही उपलब्ध होते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना ही संधी मिळत नाही, असं या क्षेत्रात काम केलेल्या अदितीचे मानणे आहे.
सध्या माझे लक्ष केवळ ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेवर केंद्रित आहे, असं बॉलिवूडमधील प्रवेशाबाबत बोलताना ती म्हणाली. माझ्याकडे करण्यासाठी बरंच काही असून, आलेल्या संधीला वाया घालविणाऱ्यातली मी नाही. आपल्या यशाने कुटुंबियांची मान अभिमानाने उंचावली असून यात कुटुंबियांची मोलाची मदत लाभल्याचे ती आवर्जुन सांगते.
‘फेमिना मिस इंडिया २०१५’चे प्रसारण दुरचित्रवाणीवर ५ एप्रिल रोजी होणार आहे.