झी मराठीवरील सेलिब्रेटी सारेगमप च्या सीझन मधून अवघ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे अमृता नातू! मुळची सांगलीची असलेल्या अमृताने शास्त्रीय संगीताचा रियाज सातत्याने करीत अथक परिश्रमांच्या बळावर यश मिळविले आहे. शंकर महादेवन यांच्या सोबत गायलेले ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले’… ह्या रोमॅंटिक गाण्याने तर तरुणाईला वेड लावले. स्वतःचा सोलो अल्बम असावा असे प्रत्येक गायकाचे स्वप्न असते तेच स्वप्न अमृता ने उराशी बाळगले आणि तिचा पहिला वहिला ‘अमृता’ ह्या अल्बमचे काही वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका पल्लवी जोशी हिच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. अमृताच्या पहिल्या वहिल्या ”अमृता” ह्या अल्बम मधील ‘भेटला पाऊस’ ह्या वैभव जोशी लिखित आणि नरेंद्र भिडे ह्याचे सुमधुर संगीत असलेल्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओचे दिग्दर्शन सागरिका म्युझिक कंपनीच्या सागरिका दास यांनी केले असून पहिल्यांदाच गायिका अमृता नातू हिच्यावर गाणे चित्रित करण्यात आले आहे.
मला खरच खूप आनंद झाला आहे कि, माझ्याच अल्बम मधील गाण्याचा व्हिडीओ माझ्यावर चित्रित करण्यात आला आहे आणि जो सागरिका म्युझिक कंपनीतर्फे रिलीज होतोय. अतिशय उत्तमप्रकारे पावसाचे साजेसे असे वर्णन आणि सागरिका दास यांचे अभ्यासू दिग्दर्शन ह्यासार्व गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्याने  हे गाणे नक्कीच सर्वाना आवडेल अशी आशा अमृताने व्यक्त केली.

अमृता माझ्याकडे एक दोन नव्हे तर तब्बल आठ गाणी घेऊन आली होती पण त्यातून मी भेटला पाऊस  या गाण्याची निवड केली. याचे कारण म्हणजे गाण्याचे उत्तम शब्द आणि मधुर संगीत. पाऊस हा मला स्वतःला खूप आवडतो आणि हे पावसावरील गाणे असल्याने मी या गाण्याची निवड केली.त्यात अमृताच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चार चाँद लागले असल्याचे सागरिका दास यांनी आवर्जून सांगितले.