बॉलीवूड मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याबाबत आमिरने त्याच्या फेसबुक पेजवर पोस्टदेखील टाकले आहे.
पंतप्रधानाबरोबच्या आपल्या या भेटीचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करत आमिरने म्हटले की, आताच भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला. यावेळी आमिर खानने त्याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’मध्ये दाखविण्यात आलेल्या विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमाद्वारे राबविण्यात आलेल्या ‘व्होट फॉर चेन्ज’ मोहीमेला देशभरातून मिळालेल्या समर्थनाबाबत त्याने पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींनीसुद्धा या विषयांकडे जातीने लक्ष्य देण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याचे आमिरने म्हटले आहे.
‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या दुस-या पर्वाचे पहिले चार भाग मार्चमध्ये दाखविण्यात आले होते. काही महिन्यांच्या अंतराने पुढील चार भाग दाखविण्यात येणार असून, उर्वरित चार भाग वर्षाच्या शेवटी दाखविण्यात येतील.