राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनीत ‘पीके’ चित्रपटात परग्रहावरून पृथ्वीवर अवतरलेल्या एका एलियनच्या नजरेतून देव, धर्म आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यावर केलेले भाष्य बऱ्याच लोकांच्या पचनी पडलेले नाही. चित्रपटाचा आशय हा हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारा आहे, अशी ओरड हिंदुत्त्ववादी संघटनांनी केल्याने आमिर आणि दिग्दर्शक हिरानी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर आम्हाला सगळ्या धर्माबद्दल आदर आहे. ‘पीके’ची कथा संयत पद्धतीनेच लिहिली असून उगाचच सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा चित्रपट के लेला नाही, असे आमिरने स्पष्ट केले.
‘पीके’ चित्रपटात आमिर शंकराची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा पाठलाग करताना दिसतो. चित्रपटात धार्मिक गुरूंबद्दलही उपहासात्मक टीका करण्यात आली आहे, या प्रकारच्या दृष्यांमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. तर ट्विटरसारख्या सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून आमिरसारख्या कलाकाराकडून ही अपेक्षा नव्हती, अशाप्रकारची टीका केली जाते आहे. दिग्दर्शक राजू, निर्माता विधू विनोद चोप्रा व पटकथाकार अभिजीत जोशी सगळे हिंदूच आहेत. त्यांच्यापैकी कोणीही चित्रपटाला विरोध केलेला नाही’, असे आमिर खानने स्पष्ट केले आहे.