‘गुरू ठाकूर’ हे नाव उच्चारले की गुरूने लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. प्रामुख्याने ‘गीतकार’ अशी ओळख असलेला गुरू आता लवकरच प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना नव्या ‘गणवेशा’त भेटणार आहे. आगामी ‘गणवेश’ या मराठी चित्रपटात गुरू अभिनय करणार असून या चित्रपटात तो वीटभट्टीवरील मुकादमाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.कारकिर्दीच्या सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करणाऱ्या गुरूने एका एकांकिकेसाठी गाणे हवे म्हणून ते लिहिले आणि पुढे कवी-गीतकार अशीच त्याची ओळख झाली. मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रात त्याने आपल्या गाण्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला, वेगळी ओळख निर्माण केली. ‘नटरंग’ या चित्रपटात त्याचा अभिनय पाहायला मिळाला होता. पण, आता ‘गणवेश’च्या निमित्ताने त्याच्यातील अभिनेत्याचे दर्शन पुन्हा घडणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक व छायालेखनकार अतुल जगदाळे यांच्यामुळे गुरू या चित्रपटात वीटभट्टीवरील मुकादमाच्या भूमिकेत दिसणार आहे. सामाजिक विषयावरील या चित्रपटात किशोर कदम, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर हे कलाकार आहेत. गीतकार गुरू आता पुन्हा एकदा अभिनय करणार असून प्रेक्षकांना व गुरूच्या चाहत्यांनाही गुरूच्या नव्या भूमिकेची उत्सुकता आहे.