हिंदी चित्रपटांमधील संगीत हा चित्रपटाचा पाया समजला जातो. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच संगीत लोकांपर्यंत पोहोचते आणि ते प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात मुख्य भूमिका पार पाडते. बॉलीवूड संगीत म्हणजे केवळ पंजाबी गाणी, लग्न किंवा पार्टीची गाणी हे स्वरूप आता बदलू लागले आहे. हिंदी चित्रपटांमध्येही विविध स्वरूपांचे संगीत येऊ लागले असून त्यामुळे नव्या गायकांना आणि संगीतकारांना संधी मिळू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बॉलीवूडच्या संगीतावर या स्वतंत्र संगीतकारांच्या रचनांचा प्रभाव दिसून येईल, असे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी सांगितले.‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘वो लम्हे’सारख्या तरुणांच्या मनाला भिडणाऱ्या विषयांवरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहितने त्याच्या चित्रपटातील संगीतालाही तितकेच महत्त्व दिले आहे. चित्रपटाच्या कथानकामध्ये त्याचे संगीत महत्त्वाची भूमिका बजावत असते, तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी चित्रपटांची गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र नव्या संगीतकारांचा बॉलीवूडमधील प्रवेश अजूनही तितकासा सोपा नाही. कित्येक तरुण संगीतकार, गायकांना आजही निर्माते, दिग्दर्शकाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागतात. हे चित्र बदलण्यासाठी मोहित सुरी आणि ‘युनिव्हर्सल म्युझिक’ने भारताच्या कानाकोपऱ्यातील नव्या संगीतकारांना शोधण्यासाठी ‘ईएमआय रेकॉर्ड्स इंडिया’सोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवोदित संगीतकार, गायकांना बॉलीवूड चित्रपटामध्ये गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. सध्या बॉलीवूडमध्ये नव्याने येणाऱ्या स्वतंत्र संगीतकार आणि गायकांच्या गाण्यांमुळे चित्रपट संगीताचे रूप पालटले आहे. नवे तरुण संगीतामध्ये प्रयोग करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे पारंपरिक गाणी, इलेक्ट्रॉनिक संगीत, पाश्चात्त्य संगीताच्या मिश्रणाने ते नव्या रचना करतात. ‘आशिकी २’, ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटांसाठी काही नव्या तरुण संगीतकारांच्या रचना वापरल्या होत्या. ती गाणी तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे हे नवोदित संगीतकार आपल्या रचना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील श्रोत्यांपर्यंत सहजरीत्या पोहोचवितात. त्यामुळे हे नवे संगीतकारही तरुणाईमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आहेत. येत्या काही वर्षांमध्ये हे नवे संगीतकार आणि गायकच बॉलीवूड संगीताचे भविष्य ठरवतील. त्यामुळे बॉलीवूडनेही या संगीतकारांच्या कामाला योग्य महत्त्व देण्याची गरज आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये स्वतंत्र संगीतकार आणि त्यांचे अल्बम्स चित्रपटातील संगीतांइतकेच प्रसिद्ध असतात. या संगीतकारांची गीतेही तरुणाईच्या तोंडी असतात; पण भारतात मात्र लोकांवर बॉलीवूडचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे संगीतामध्ये रोज नवे प्रयोग करण्यास उत्सुक असलेल्या नव्या दमाच्या संगीतकाराचे संगीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप खस्ता खाव्या लागतात; पण लवकरच हे चित्र बदलून येत्या काही वर्षांमध्ये हे संगीतकार लोकांच्या मनावर राज्य करतील, असा विश्वास मोहित सुरीने व्यक्त केला.