‘कलर्स’ वाहिनीला लोकप्रियता आणि सातत्याने टीआरपी मिळवून देणारा शो म्हणून ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ने अक्षरश: धुमाकूळ घातला. या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा तीन वर्षांत छोटय़ा पडद्यावरून बॉलीवूडपर्यंत पोहोचला. म्हणजे बॉलीवूडपट करायची इच्छा पूर्ण करण्यापर्यंतचे बळ कपिलला या शोने दिले. मात्र, शोचा कर्ताधर्ता तोच असल्याने त्याच्या फिल्मी कारकीर्दीचा श्रीगणेशा विलंबाने होण्यासही त्याचा शोच कारणीभूत ठरला आहे. आजपर्यंत या कपिल शर्माला वाहिनीच्या नियमांमुळे या शोपासून एकही भाग दूर राहता आले नव्हते मात्र, सध्या त्याची तब्येत बिघडली असल्याने त्याने शोमधून विश्रांती घेतली आहे.
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कपिल शर्माच्या शोने छोटय़ा पडद्यावर तोपर्यंत स्थिरावलेल्या ‘स्टँड अप कॉमेडी’ या प्रकाराला एक वेगळे रूप दिले. म्हटले तर विनोदी मालिका आणि त्याला बॉलीवूडपटांच्या प्रसिद्धीचा तडका दिल्यामुळे दर आठवडय़ाला मोठमोठय़ा कलाकारांना टीव्हीवर पाहण्याची प्रेक्षकांना मिळालेली संधी यामुळे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. २०१३ मध्ये हा शो ‘कलर्स’ वाहिनीवर आला तेव्हापासून दोन वर्षे सातत्याने टीआरपीच्या तक्त्यात शो वरचढ ठेवण्यात कपिल शर्माला यश मिळाले. आतापर्यंत कपिलला कुठल्याही कारणामुळे या शोपासून दूर राहता आले नव्हते. मात्र, गेल्या आठवडय़ापासून कपिलचा चेहरा या शोमध्ये दिसत नाही आहे. कपिलची तब्येत बिघडली असल्याने त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस तरी तो या शोमध्ये दिसणार नाही.
खुद्द कपिलनेच आपण काही दिवस शो करू शकणार नसल्याचे ट्विटरवर जाहीर केले आहे. तब्येतीमुळे कपिलला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, कपिलच्या अनुपस्थितीचा फार मोठा फटका बॉलीवूडला बसणार आहे. कपिलचा शो बॉलीवूडजनांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी इतका चांगला प्लॅटफॉर्म सध्या त्यांच्याकडे नाही. शिवाय, कपिलच्या हजरजबाबीपणामुळे या शोमध्ये जी रंगत वाढते त्याची सर दुसऱ्या कोणत्याही शोला नाही. पुढच्या महिन्याभरात सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’सह अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. कपिललाही जाण्यापूर्वी सलमानबरोबर अखेरचा भाग चित्रित करावा लागला आहे. ‘बजरंगी भाईजान’साठी बॉलीवूडच्या ‘भाई’बरोबर चित्रीकरण करून मग कपिलने सुट्टी घेतली आहे. त्यामुळे भाईजान सुटले असले तरी अन्य कलाकारांना मात्र कपिल कधी शोमध्ये परतणार ही चिंता सतावणार आहे.