बॉलिवूडचा किंग, बॉलिवूडचा बादशाह, बॉलिवूडचा सुपरस्टार.. किती किती नावाने त्याचे गोडवे याआधी गायले गेले आहेत. यशराजचा एकु लता एक लाडका नायक म्हणून सगळे चित्रपट, सगळ्या नायिका आणि सगळे पुरस्कार आपल्या खिशात घालणारा किंग खान अर्थात शाहरूख खान हळूहळू एकटा पडत चालला आहे, असे दिसते आहे. बॉलिवूडमधील अन्य दोन खानांच्या, त्यातही लाडका शत्रू सलमान खानच्या वाढत्या वर्चस्वामुळे आपले धोक्यात आलेले सुपरस्टारपद वाचवण्यासाठी शाहरूखची जी केविलवाणी धडपड सुरू आहे ती कोणापासून लपलेली नाही. पण, या सगळ्यांमुळे त्याच्या वागण्यात आलेला उद्दामपणा आता त्याच्या मित्रांच्याही सहनशक्तीपलीकडे गेला आहे आणि एकेक जण ‘मन्नत’मधून बाहेर पडून थेट सलमानच्या घरचा रस्ता धरत आहेत.
गेल्या वर्षी फराह खानच्या नवऱ्याबरोबर शाहरूखने भांडण केले. मग काही काळ खुद्द फराहशी त्याने पंगा घेतला. आणि आता त्याचा मित्र अर्जुन रामपालशीही त्याचे वाजले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अर्जुनने सलमानशी मैत्री वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सलमानला गेल्या दोन वर्षांत मिळालेले यश ही शाहरूखसाठी चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पण, एकंदरीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांचाही त्याला चांगलाच फटका बसला आहे. आजचे दिग्दर्शक नवनवीन कलाकारांबरोबर प्रयोग करू पाहत आहेत. खुद्द यशराजनेही शाहरूखला फाटा देत आमिर आणि सलमानला आपले नायक बनविले. आणि या दोघांनी आपली निवड सार्थ करत यशराजला कोटय़वधीचा गल्ला जमवून दिला आहे. आत्तापर्यंत यशराज आणि करण जोहरच्या चित्रपटांमध्येच अडकून पडलेल्या शाहरूखला हे अचानक झालेले बदल पचवता आलेले नाहीत.
शाहरूखनेही यशासाठी आता रोहित शेट्टीचा आधार घेतला आहे. मात्र, अभिनेता म्हणून आणि मित्र म्हणून त्याच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे. याचे प्रत्यंतर नवीन वर्षांसाठी त्याने दिलेल्या पार्टीतही आले. शाहरूख आणि गौरी खान यांनी दुबईत आपल्या मित्रांसाठी ही पार्टी दिली होती. पण, अर्जुन रामपाल-मेहेर जेसिया, ह्रतिक – सुझ्ॉन रोशन यांनी या पार्टीला हजेरी लावली नाही. कळस म्हणजे शाहरूखचा सगळ्यात जवळचा मित्र करण जोहर आणि फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राही हो-नाही करत दुबईत पोहोचले पण, शाहरूखच्या घरी पार्टी करण्याऐवजी त्या दोघांनीच स्वतंत्र पार्टी करत आपण ना शाहरूखच्या बाजूचे ना सलमानच्या बाजूचे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूडच्या अवकाशात सध्या तरी सलमानचाच गजर सुरू आहे हा गजर वाढत वाढत गेला तर नक्कीच बॉलिवूडचा ‘किं ग’ कोण?, या प्रश्नावर वेगळे उत्तर मिळेल.