अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राज कुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोप्रा हे तिघेच ‘पीके’सारखे उत्कृष्ट चित्रपट तयार करू शकतात, असे विधान चौदा दिवसांच्या अभिवाचन रजेवर तुरूंगाबाहेर आलेल्या अभिनेता संजय दत्तने केले आहे.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजूबाबा बुधवारी चौदा दिवसांच्या सुट्टीवर बाहेर पडला. त्याच्यासाठी ‘पीके’च्या टीमने स्पेशन स्क्रिनिंग आयोजन केले होते. चित्रपट उत्कृष्ट असून त्यातील आपल्या भूमिकेवर संजय दत्तने समाधान व्यक्त केले. तसेच चित्रपटाला मिळणाऱया प्रतिसादावर आनंदी असल्याचेही तो पुढे म्हणाला.
‘पीके’ चित्रपटाच्या कथेत सत्य आणि प्रमाणिकता आहे आणि त्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरत आहे. राजू, विधू आणि आमिर हे तिघेच अशाप्रकारचे चित्रपट करू शकतात, असे संजय दत्त म्हणाला. १९ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला आहे. केवळ चार दिवसांत ‘पीके’ने १०० कोटींच्या कमाईचा पल्ला गाठला असून अजूनही चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे.