पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांमध्ये स्वच्छतेविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी स्वच्छता अभियानास सुरुवात केली. यासाठी ते अनेक उपक्रम राबवीत आहेत. त्यांनी स्वत:देखील हातात झाडू घेऊन साफसफाई केली. आपल्या भाषणांमधून त्यांनी अनेक वेळा देशवासियांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत देशात स्वच्छता बाळगण्यास सांगितले. 'स्वच्छ भारत' अभियानात सरकारी कार्यालये, व्यावसायिक, चित्रपट कलाकार आणि सामान्य नागरिक इत्यादिंना समाविष्ट करून घेत त्यांनी सर्वांना स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. हाती झाडू घेत दिल्लीतील एका वस्तीत साफसफाई करणाऱ्या पंतप्रधानांनी 'वर्षांतून १०० तास सार्वजनिक स्वच्छतेसाठी देईन,' अशी शपथ देशवासियांकडून वदवून घेतलीच; पण त्याचबरोबर देशातील नऊ नामांकीत व्यक्तींना 'चॅलेंज' देत सेलिब्रिटींनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले. 'स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून मोदी यांनी नऊ जणांची नावे घोषित केली. त्यात सिने अभिनेता अमीर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, कमल हसन, भारतरत्नने सन्मानित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी व काँग्रेस नेते शशी थरूर यांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत' उपक्रमासाठी आणि या उपक्रमात आपले नाव सामाविष्ट केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. सलमानने मंगळवारी कर्जत येथून सफाईच्या कार्यास सुरुवात केली. साफसफाई करतानाची छायाचित्रे त्यानी स्वत:च्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहेत. त्याचबरोबर 'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि टि्वटरवरील आपल्या चाहात्यांबरोबर अमीर खान, अझिम प्रेमजी, चंदा कोचर, ओमर अब्दुल्ला, प्रदीप धूत, रजत शर्मा, रजनिकांत, आणि विनीत जैन यांचे नामांकन केले असून, यासर्वांनी अन्य नऊ जणांना या अभियानाशी जोडावे असे आवाहनदेखील त्याने केले आहे.(छाया - सलमान खान फेसबुक पेज)