‘एआयबी’ या वादग्रस्त कार्यक्रमावर टीका करण्याच्या मुद्द्यावरून चित्रपटनिर्माती आणि आलिया भटची सावत्र बहीण पुजा भट्ट हिने आमिर खानला चांगलेच धारेवर धरले. ‘दिल है की मानता नही’ या चित्रपटात आमिर खान आणि पुजा भट्ट यांनी एकत्र काम केले होते. मात्र, आमिर खानने काही दिवसांपूर्वीच एआयबीवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना पुजाने आमिरचा उल्लेख चक्क घाबरट असा केला.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पुजा भट्ट हिने वैयक्तिक जीवनात खूपच घाबरट असणाऱ्या आमिरचे एआयबीसंदर्भातील विधान म्हणजे नैतिक दांभिकतेचा पुरावा असल्याचे म्हटले. स्वत:चे प्रतिमासंवर्धन करणाऱ्या आमिरच्या या विधानाने मी थक्क झाले आहे. आमिर खानला बहुतेक त्याच्या आतापर्यंतच्या कामाचा विसर पडला असावा. ‘दिल्ली बेली’ चित्रपटातील ‘भाग डी के बोस डी के’ हे गाणे किंवा त्याच्या ‘पीके’ चित्रपटाचे वादग्रस्त पोस्टर याचा विचार केल्यास आमिरचे काम कल्पनेच्या मर्यादा ओलांडणारे आणि सनी लिओनीलाही लाजवणारे असल्याचे पुजा भट्टने सांगितले.
काही दिवसांपूर्वी आमीर खानने ‘एआयबी’ हा हिंसक शो असल्याचे म्हणत नाराजी दर्शवली होती. त्याचप्रमाणे त्यात सहभागी सेलिब्रेटी आणि त्यांच्या भाषेवरही ताशेरे ओढले होते.