'अगं बाई अरेच्चा' प्रदर्शित झाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल 'अगं बाई अरेच्चा २' प्रदर्शित होत आहे. स्त्रियांच्या मनातील विचार अचानक ऐकू येऊ लागल्यानंतर गोंधळ उडालेल्या श्रीरंगाची कथा पहिल्या भागात दाखविण्यात आली होती. यावेळी केदारने स्पर्श या इंद्रियाचा वापर करून धमाल उडवायचे ठरविले आहे. हा चित्रपट येत्या २२ मे रोजी प्रदर्शित होत आहे. अगं बाई अरेच्चा २ तुम्ही का पाहाल याची कारणे-केदार शिंदे-दिलीप प्रभावळकरः गंगाधर टिपरे या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या चित्रपटाचा पूर्वार्ध दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरून घेण्यात आला असून उत्तरार्ध केदार शिंदे यांनी रंगविला आहे.चित्रपटाची कथाः स्त्रियांच्या मनातील ऐकू येणारा श्रीरंगा (संजय नार्वेकर) पहिल्या भागात पाहावयास मिळाला. मात्र, यंदा श्रीरंगाची जागा शुभदाने (सोनाली कुलकर्णी) घेतली आहे. मात्र, शुभदाची कथाचं पूर्णपणे वेगळी आहे. पाच इंद्रियांपैकी एक असलेला स्पर्श या सिक्वलमधून उलगडण्यात येणार आहे. शुभदाच्या आयुष्यात आलेल्या सहा पुरुषांवर चित्रपटाची कथा आहे. स्पर्शाद्वारे कशी धमाल उडते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे राहिल.सोनाली कुलकर्णीः सोनाली या चित्रपटात सहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिने ‘शुभांगीची’ व्यक्तिरेखा साकारली असून तिची मनोवस्था सारखी बदलत असते. बदलत्या मनोवस्थेमुळे ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडते. आनंदी, दुःखी, गोंधळलेली असे विविध भाव या व्यक्तिरेखेमध्ये सामावले आहेत. आतापर्यंत सोनालीने गंभीर भूमिका साकारलेल्या आहेत. मात्र, यात ती खोडकर रुपात पाहावयास मिळेल. ‘डॉ. प्रकाश आमटे’ चित्रपटातल्या मंदाताईंच्या भूमिकेनंतर सोनालीचा हा एक वेगळा प्रयत्न आहे, यात शंका नाही.कलाकारः 'जय मल्हार' या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून सोनाली कुलकर्णी, धरम गोहील, चारुशिला साबळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर भरत जाधव, प्रसाद ओक, माधव देवाचाक्के, सिध्दार्थ जाधव हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.बॉलीवूड टचः या चित्रपटाला बॉलीवूड टच मिळाला आहे. अनेक सुपरहीट बॉलीवूडपटांची निर्मिती करणाऱया इरॉस इंटरनॅशनल कंपनीने ‘अगं बाई अरेच्चा २’ ची निर्मिती केली आहे.संगीतः 'अगं बाई अरेच्चा' हा अजय-अतुल यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातील गाणी अजूनही गुणगुणली जातात. अजय-अतुलवर विश्वास ठेवत केदार शिंदेने त्यांना पहिला ब्रेक दिला होता. यावेळी केदारने २० वर्षीय निशादला ही संधी दिली आहे. निशादने 'अगं बाई अरेच्चा २'चे संगीत दिग्दर्शन केले असून, शंकर महादेवन, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, मनोहर गोलाम्बरे यांनी गाणी गायली आहेत.