सिल्क स्मिता हे नाव जरी घेतले तरी तिची मादक अदा डोळ्यांसमोर येते. पण स्मिताचा सिल्क स्मिता बनण्याचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. ती जेव्हाही रस्त्यावरुन जायची तेव्हा तिच्याकडे बघून अनेकजण अश्लिल बोलायचे किंवा बोलायचा तरी. तिला असे बोलले जायचे कारण त्यावेळी ती त्याच धाटणीचे सिनेमेही करत होती. बोल्डनेस आणि बिंदास हे शब्द स्मितासाठीच बनवले गेले असावेत असे तेव्हाच्या प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना वाटायचे. जीवनात एका वळणावर एकटी पडलेल्या या अभिनेत्रीने म्हणे आत्महत्या केली होती. आज सिल्क स्मिताचा वाढदिवस. २०११ मध्ये विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या सिनेमामुळे विद्याचे अभिनय करिअरही जोरात सुरु झाले. 'द डर्टी पिक्चर'ची कथा ही सिल्क स्मिताच्या आयुष्यावरच बेतलेली होती. २ डिसेंबरला विद्या बालनचा 'कहानी २' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यात दिवशी सिल्क स्मिताचा वाढदिवसही असतो. स्मिताला १९७८ मध्ये कन्नड सिनेमा 'बेदी'मध्ये पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात काम केले तरी तिच्या करिअरला कलाटनी देणारा सिनेमा ठरला 'वांडीचक्रम' (१९७९). या सिनेमात निभावलेली स्मिताची व्यक्तिरेखा लोकांना पसंत पडली. या सिनेमात वापरलेल्या मद्रासी चोळीलाही तिनेच फॅशन ट्रेण्डमध्ये आणले. तिची ही व्यक्तिरेखा लोकांना एवढी आवडली की नंतर तिने तिचे नाव सिल्क स्मिता असेच ठेवले. त्यानंतर ती जे करायची तो एक ट्रेण्डच बनून जायचा. १९८३ मध्ये तिने 'सिल्क सिल्क सिल्क' या नावाचाही सिनेमा केला होता. करिअरच्या तीन वर्षांमध्येच तिने २०० हून अधिक सिनेमात काम केले. तेव्हाच्या प्रत्येक दिग्दर्शकाला तिने आपल्या सिनेमात काम करावे असेच वाटत होते. तिने काम जरी नाही केले तरी एखादे गाणे तरी करावेच असे वाटत होते. ती तेव्हा फक्त एक गाणे करण्यासाठी सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली होती. दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी यांसारखे अभिनेतेही त्यांच्या सिनेमात सिल्कचे एखादे गाणे ठेवायचेच. सिल्कचा प्रत्येक सिनेमा हा यशस्वीच ठरत होता. त्यामुळे १० वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिने जवळपास ५०० हून अधिक सिनेमात काम केले. सिल्कने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. 'जीत हमारी' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर ताकतवाला, 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही' आणि 'विजय पथ' यांसारखे सिनेमे केले होते. सिनेमांत काम करत असताना तिने चांगले यश संपादन केले होते. त्याच काळात तिच्या जवळच्या मित्राने तिला निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा सल्ला दिला. सिल्क निर्मिती क्षेत्रात उतरलीही, पण पहिल्या दोन सिनेमातच तिला सुमारे दोन कोटींचे नुकसान सहन करावे लागले. निर्माती म्हणून तिचा तिसरा सिनेमा पूर्णच होऊ शकला नाही. सिनेमात होणाऱ्या अपयशाची झळ तिच्या वैयक्तिक आयुष्यातही जाणवत होती. सिल्क स्मिताबद्दल समिक्षक सांगतात की, 'सिल्कला खरंतर तिच्या लोकप्रियतेनेच मारले. तिची प्रतिमा एक मादक अभिनेत्री अशीच बनली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रातही तिच्याबद्दन वाईटच लिहिले जायचे. रस्त्यावरुन जाणारे वाटसरुही ती दिसली की अश्लिल चाळे करायचे. हे सर्व तिला सहन करण्या पलिकडचे होते.' शेवटी चेन्नईच्या तिच्या राहत्या घरी २३ डिसेंबर १९९६ मध्ये ३५ वर्षिय स्मिताला मृत पाहिले गेले. असे बोलले जाते की सिल्क आपल्या जीवनाला एवढी कंटाळली होती की तिला आत्महत्या करणेच योग्य वाटले. तर काहींच्या मते तिच्या मृत्यूच्या मागे वेगळेच रहस्य आहे. १८ वर्ष दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य जागवणारी सिल्क स्मिता जगासाठी शेवटपर्यंत एक कोडंच बनून राहीली.