स्टार प्रवाहवरील आम्ही दोघं राजा राणी या मालिकेतील पार्थ आणि मधुराचं लग्न भन्नाट पद्धतीनं होणार आहे. तुम्ही असं लग्न कधी पाहिलंच नसेल… कारण, या लग्नाचा खर्च पार्थच्या घरचे करणार आहेत आणि लग्नानंतर पार्थच्या घरी मधुराबरोबर तिच्या घरचेही येणार आहेत. आता अशा या जगावेगळ्या लग्नात काय काय धमाल होते हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. खरे मुंबईकर आणि अस्सल पुणेकर यांच्यातील धमाल टशन ‘आम्ही दोघं राजा राणी’ या मालिकेत रात्री आठ वाजता पाहायला मिळत आहे. पार्थनं त्याच्या आजीची आणि मधुरानं तिच्या बाबांची समजूत काढल्यानंतर या दोघांना लग्नाची परवानगी मिळाली आहे. लग्नाचा खर्च हा मुलीकडच्यांनी करायचा अशी एक पद्धत रूढ आहे. मात्र, मधुराच्या कंजुष वडिलांनी या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी नाईक कुटुंबियांवरच टाकली आहे. आजीला अजूनही मधुरापेक्षा तनुश्रीच जास्त पसंत आहे. हळद आणि संगीत कार्यक्रमात तनुश्रीही उपस्थित असते.

हळदीच्या कार्यक्रमात तनुश्रीच हळद लावून घेते, मधुराची अंगठी ती गायब करते आणि गोंधळ होतो. परंपरेनुसार लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी रहायला जाते. मात्र, या मालिकेत खरी धमाल पार्थ आणि मधुराचं लग्न झाल्यानंतर येणार आहे. कारण, लग्नानंतर मधुरासह तिच्या घरचे तिच्या सासरी, म्हणजे नाईकांकडे रहायला जाणार आहेत. लेले कुटुंबिय नाईकांच्या घरी रहायला गेल्यानंतर मोठीच मजा येणार आहे. आतापर्यंतच्या टीव्ही मालिकांमध्ये पार्थ आणि मधुराचं लग्न वेगळं आणि अजब ठरणार हे नक्की!

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खास लग्नासाठी स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’, ‘गोठ’, ‘पुढचं पाऊल’, ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांतील लोकप्रिय कलाकार हजेरी लावणार आहेत. तसंच लग्नाच्या सोहळ्यात त्यांचे परफॉर्मन्सही होणार असल्यानं हा लग्न सोहळा म्हणजे ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. या सगळ्यासाठीच ‘आम्ही दोघं राजा राणी’ या मालिकेतील हा अजब विवाह सोहळा रोज रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पहायलाच हवा.