बॉलिवूड अभिनेता आमिर खानला त्याच्या 'दंगल' सिनेमासाठी 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आमिरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमिरशिवाय क्रिकेटर कपिल देव आणि ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनाही ७५ व्या दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले. 'दंगल' सिनेमातील उत्कृष्ट कामामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्यावतीने आमिरची निवड करण्यात आली. तर क्रिकेट जगतात आपल्या बहुमोल योगदानाबद्दल कपिल देव यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये किरण रावच्या एका वक्तव्यामुळे आमिर आरएसएसच्या निशाण्यावर आला होता. भारतात असहिष्णुतेचं प्रमाण वाढलं आहे, या आमिरच्या विधानाला आरएसएसकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. 'मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान' आणि 'हृदयेश आर्ट्स'च्या वतीने दरवर्षी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गजांना दिले जातात. यात संगीत, समाजसेवा, नाटक- साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातात. आमिर नेहमीच पुरस्कार सोहळ्यांपासून दोन हात लांब राहणं पसंत करतो. पण यावेळी त्याने त्याचाच नियम मोडला, असे म्हणावे लागेल. या पुरस्कारावेळी बोलताना आमिर म्हणाला की, 'आज मी ज्या स्थानी आहे त्याचं सगळं श्रेय लेखकांना जातं. उत्तम दिग्दर्शक आणि लेखकांमुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.' नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' सिनेमाचे कथानक कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले आहे.