बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या ‘दंगल’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पुण्यात दाखल झाला आहे. पंजाबमध्ये ‘दंगल’चे चित्रिकरण करून आमिर काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतला होता. त्यानंतर काल तो पुण्यासाठी रवाना झाला. पुण्यातील काही स्टेडियम्समध्ये ‘दंगल’च्या काही भागाचे चित्रिकरण होणार आहे. त्यासाठी आमिर खान साधारण दहा दिवस पुण्यात मुक्काम करणार असल्याचे समजते.
गेले दोन महिने आमिर लुधियानात ‘दंगल’चे चित्रीकरण करत होता. पण चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने आमिरला मुंबईत परतावे लागले होते. दरम्यानच्या काळात आमिरच्या एका विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. या विधानामुळे अनेकांनी आमिरविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यामुळे ‘दंगल’च्या चित्रिकरणात अडथळे येण्याची शक्यता होती. पण यासर्व गोष्टींकडे लुधियानावासियांनी दुर्लक्ष केले करत आमिरचे जोरदार स्वागत केले. आमिरच्या धर्मामुळे पंजाबच्या आदरातिथ्यात कधीच फरक पडणार नाही. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे हीच पंजाबची शान आहे, असे सांगत लुधियानावासियांनी आमिरचे खुल्या दिलाने स्वागत केले होते.