बॉलीवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा चित्रपट म्हटलं की त्यात पुरेपूर मालमसाला पाहावयास मिळतो. मैत्री, प्रेम, नात्यात बदलत जाणारी समीकरणं आणि प्रेमभंग यावर त्याचा आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट बेतलेला आहे. नुकतेच या चित्रपटातील लग्न समारंभांना साजेसे असे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मावर ‘क्युटीपाय’ हे गाणे चित्रीत करण्यात आले असून या दोघांनीही गाण्यात धम्माल केलेली दिसते.

रणबीर-ऐश्वर्याची हॉट केमिस्ट्री आत्तापर्यंत चित्रपटाच्या गाण्यांतून आणि ट्रेलरमधून दाखविण्यात आली होती. पण ‘क्युटीपाय’ या गाण्यात रणबीर आणि अनुष्का यांच्यातील खोडकर अंदाज आणि त्यांच्यातील सुरेख केमिस्ट्री आपल्याला पाहावयास मिळते.  चित्रपटात या दोघांनी ‘बेस्ट फ्रेण्ड्स’ची भूमिका साकारली आहे. ‘क्युटीपाय’ गाण्यात अनुष्का आकर्षक दिसत असून तिच्यावरून तुमची नजर हटणार नाही. आणि रणबीरला विसरून कसे चालेल. प्रेमभंग झालेला रणबीर त्याच्या अभिनयाने आपल्या मनावर एक छाप सोडून जातो. या गाण्यास प्रितमने संगीत दिले असून प्रदीप सिंग स्रण आणि नक्ष अझिझ यांनी गायले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य याने त्यास लिहले आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील आत्तापर्यंत पाच गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बुल्लेया’, ‘चन्ना मेरेया’, ‘ब्रेकअप साँग’ आणि आता ‘क्युटीपाय’ हे गाणे प्रदर्शित झाले असून प्रत्येक गाण्यात वेगळेपणा पाहावयास मिळतो. सहसा चित्रपटांतील ब्रेकअपच्या गाण्यात विरह, दुःख पाहायला मिळते. पण या चित्रपटातील गाणे उलट प्रेक्षकांना थिरकायला लावणारे असे आहे. त्यामुळे ‘ब्रेकअप साँग’नंतर ‘क्युटीपाय’ गाण्यालाही तितकाच प्रतिसाद मिळतो का ते लवकरच कळेल. दिवाळीच्या मुहुर्तावर २८ ऑक्टोबरला ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.