उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना २५ सप्टेंबरपर्यंत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. त्यांनी २५ सप्टेबंरपर्यंत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशाराही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचूप भारत सोडल्याची चर्चा आहे. तसेच, तो आता भारतात परतण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरच्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणा-या फवादने भारतातून पळ काढला आहे. भारतात काम करण्यास विरोध करण्यात येणा-या पाकिस्तानी कलाकारांच्या यादीत फवादचे नाव सर्वात प्रथम घेतले जातेय. दरम्यान, आज मनसे कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर याच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत नारेबाजी केली. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध केला आहे. फवाद आता यापुढे 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग नसणार असल्याचे करणने म्हटले होते. एका वृत्तवाहिनीसमोर आपले मत मांडताना करण जोहर म्हणालेला की, ‘या हल्ल्याबाबत व्यक्त होणारा राग आणि असंतोष मी समजू शकतो. या हल्ल्यात शहिद झालेल्यांसाठी मला फार दु:ख वाटत आहे. या दहशतवादी कृत्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. पण पाकिस्तानी कलाकारांवर बंदी टाकून यावर तोडगा निघणार का?’ असा सवालही त्याने उपस्थित केला होता. कलाकारांना देशाबाहेर जाण्याचा इशारा देणे ही चुकीची बाब आहे. निदान मला तरी असेच वाटते. या परिस्थितीमध्ये एखाद्या कलाकार आणि कलेवर बंदी आणण्यापेक्षा अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे’, असेही करण म्हणालेला.