बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार जोडप्यांच्या आणि प्रेमी युगुलांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. त्यातील काही कलाकारांनी खासगी आणि व्यावसायिक गोष्टी वेगळ्या ठेवत चित्रटांमध्ये एकत्र काम करणे सुरु ठेवले आहे. पण, बी टाऊनमधल्या काही प्रेमी युगुलांनी मात्र गेला बराच काळ एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. अशा कलाकारांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. त्यांचे बहुचर्चित प्रेमप्रकरण आणि ब्रेकअपनंतर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकत्र काम करतील, असा विचारही अनेकांनी केला नव्हता. पण येत्या काही काळात हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र दिसू शकतात.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ‘आपल्याला सलमान खानसोबत चित्रपटात काम करण्यास काहीच हरकत नाही’, असे म्हणत ‘मी एका अटीवरच सलमानसोबत काम करेन. ती अट म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक आणि संहिता असामान्य असली पाहिजे’, असे अॅशने स्पष्ट केले. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुर्तास सलमान कडून याबाबतीत कोणताच दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे अॅश आणि सलमानची अफलातून केमिस्ट्री पुन्हा पाहता येणार का? याबाबत शंकाच दिसतेय.

पण तरीही ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार का याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अॅशच्या या वक्तव्यामुळे चित्रपट वर्तुळामध्ये सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे रसिकांना तिची आणि अभिनेता रणबीर कपूरची केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर सलमान खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन करत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.