‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमा हो नाही म्हणता गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाची कथा अॅश आणि रणबीर कपूरच्या एकतर्फी प्रेमाभोवती फिरताना दाखवली आहे. या सिनेमाची ही कथा ऐश्वर्या रायच्या खऱ्या आयुष्याशी अगदी मिळती जुळती आहे. हे आम्ही नाही खुद्द ऐश्वर्याने सांगितले होते. एका मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या खासगी आयुष्यातल्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितलेले.

ती म्हणालेली की, ‘लोकांना असं वाटेल की मी या प्रश्नाचे थेट उत्तर देणार नाही. पण खरं सांगू तर मला कधीच एकतर्फी प्रेम झाले नाही. मी याबद्दल कधी विचारही केला नाही. ऐश्वर्या पुढे म्हणाली की, एकतर्फी प्रेम हे खासकरुन कॉलेजमध्ये असताना होतं. पण मी कॉलेजमध्ये असताना या सगळ्या गोष्टींकडे लक्षच दिले नाही. कारण तेव्हा माझ्या डोक्यात फक्त मॉडेलिंगचेच विचार होते. त्याकाळात मी माझ्या करिअरचा जास्तच विचार करत होते. मॉडेलिंग नंतर मी अभिनयात आले तेव्हाही कधी याचा विचार डोक्यात आला नाही.’

ऐशच्या मते तिला एकतर्फी प्रेम करायला कधी वेळच नाही मिळाला. कारण तिने तिचे मन, बुद्धी हे करिअरवरच दिले होते. अॅशला जरी कधी एकतर्फी प्रेम झाले नसेल पण सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय या दोघांसोबतच्या अफेअर्सची चर्चा मात्र खूप झाली.

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. याआधी अभिनेता रणबीर कपूरच्या सिनेमांच्या वाटेला काही केल्या यश मिळत नव्हते. पण, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाने रणबीरला चांगलेच तारले. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग करत सिनेमाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला हजेरी लावली होती. ‘ऐ दिल….’ सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते.