बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, संजय दत्त, अर्शद वारसी यांनी ‘धमाल’ चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. त्यानंतर आता दिग्दर्शक इंद्र कुमारच्या ‘धमाल’ सीरिजमधील तिसरा सिक्वल येणार आहे. या सीरिजमधील ‘टोटल धमाल’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.

वाचा : करणच्या पार्टीत रणबीर-कतरिना धडकले आणि त्यानंतर….

‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’ मधून रितेश देशमुख, संजय दत्तने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र, तिसऱ्या भागामध्ये या दोघांची जागा अजय देवगण आणि अनिल कपूर यांनी घेतली आहे. अर्शद वारसी तिसऱ्या भागातही त्याच्या विनोदांनी लोकांना हसवताना दिसेल.

वाचा : सुरेश वाडकरांनी माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

‘टोटल धमाल’ साठी संजय दत्तला सुरुवातीला विचारण्यात आले होते. मात्र, त्याच्यासोबतची निर्मात्यांची चर्चा काही यशस्वी ठरली नाही. तर दुसरीकडे रितेश देशमुख त्याच्या निर्मिती अंतर्गत चित्रीत होत असलेल्या ‘शिवाजी’ चित्रपटावर काम करत आहे. त्याचप्रमाणे, इंद्र कुमार आणि अशोक ठाकेरिया यांना चित्रपटातील कलाकारांमध्ये काही नवीन प्रयोग करण्याची इच्छा होती. त्यामुळेच अखेर अनिल कपूर आणि अजय देवगणला चित्रपटात घेण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. या दोन्ही कलाकारांनी ‘बेटा’ आणि ‘इश्क’ चित्रपटात इंद्र कुमारसोबत काम केले आहे. अनिल, अजय आणि अर्शद व्यतिरिक्त जावेद जाफरी आणि आशिष चौधरीदेखील ‘टोटल धमाल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारतील.