भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल देशभरातून लष्कराचे कौतुक सुरू आहे. बॉलीवूडदेखील याला अपवाद नाही. बॉलीवूडमधील दिग्गजांनी भारतीय लष्करावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

‘भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा अभिमान वाटतो. सरकारने हे पाऊल उचलले, याचा आनंद आहे’, अशा शब्दांमध्ये अक्षय कुमारने ट्विटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि ऋषी कपूर यांनीदेखील भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे. ‘भारतीय लष्कराच्या वाकड्यात शिरु नका’, अशा स्पष्ट शब्दांमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाहरुख खानने शूर जवानांना धन्यवाद दिले आहेत. ‘भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण सर्वच आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करू’, असे शाहरुखने म्हटले आहे.

मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हाने भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ‘आम्हाला अभिमान वाटतो. आपण दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक देश म्हणून आपण अतिशय सहिष्णू आहोत. मात्र आपण काय करु शकतो, हे आपण दाखवून दिले आहे’, या शब्दांमध्ये जॉन अब्राहमने फोर्स २ चा ट्रेलर लाँच करताना त्याच्या भावना व्यक्त केल्या.

सोनाक्षीने जॉन अब्राहमच्या सूरात सूर मिसळत भारतीय सैन्याचे कौतुक केले. ‘दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलल्याबद्दल धन्यवाद. ही कारवाई गरजेची होती. ही कारवाई पार पाडली, याचा आनंद आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला याचा आनंद आहे’, अशा शब्दांमध्ये सोनाक्षीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.