बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटातून काही ना काही संदेश देतच असतो. हा ४९ वर्षीय अभिनेता आपल्या चाहत्यांना प्रेरणादायी संदेश देण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या तो 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे चित्रिकरण करत असून त्यादरम्यान त्याने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओ त्याने सोशल मिडीयावरून शेअर करत 'सोच और शौच' या टॅगलाइनसह महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओतून त्याने स्वच्छता आणि शौचालयाचा मुद्दा समोर आणला असून त्यास 'सोच और शौच' असे नाव दिले आहे. अक्षयने या व्हिडिओतून मांडलेली आकडेवारी आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. चित्रपटादरम्यान सर्वेक्षण करताना समोर आलेल्या गोष्टी पाहून अक्षयला फार वाईट वाटले. शौचालयाचे महत्त्व पटवून देताना अक्षयने म्हटले की, शौचास होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसते. बराच वेळ शौचास न गेल्यास त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. याचा त्रास बऱ्याचदा ग्रामीण भागातील स्त्रियांना सहन करावा लागतो. आपल्या देशात अर्ध्याहून जास्त जनता खासकरून महिला त्यांना शौचास लागूनही त्यावेळी जाऊ शकत नाहीत. यामागचे कारण, त्यांच्या घरात शौचालयंच नसतात. त्यांना उघड्यावर किंवा शेतात शौचास जावे लागते. पण, महिलांना किंवा मुलींना दिवसा उघड्यावर शौचास जाता येत नाही. एकतर त्यांना पहाटे किंवा संध्याकाळी काळोख पडल्यावर यासाठी बाहेर पडता येते. यावरून अक्षयने पुरुष जातीवर प्रश्नचिन्ह उभे करत म्हटले की, त्या पुरुषांना लाज वाटायला हवी जे घरातील स्त्रियांना घरची अब्रू असल्याचे सांगतात पण त्यांच्यासाठी एक शौचालय बनवू शकत नाहीत. घरच्या महिलेने साडी वर करून उघड्यावर शौचास बसणे योग्य वाटते का? असा सवाल अक्षयने व्हिडिओद्वारे केला आहे. सरकारने दिलेल्या शौचालयाचा वापर अनेकजण कारखाना, गोदामासारखा करतात. अशा लोकांची कानउघाडणीही अक्षयने या व्हिडिओतून केली असून ‘बेवकूफों, वो बाथरूम है’ असे त्याने म्हटले आहे. Time hai apni #SochAurShauch dono badalne ka. Dekhiye, sochiye aur apne vichar bataiye pic.twitter.com/qpYdZwUpQ9 — Akshay Kumar (@akshaykumar) March 24, 2017 अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहे. श्री नारायण दिग्दर्शित हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे.