आयुष्याचा जोडीदाराची स्वत: निवड करुन प्रेमविवाह करण्याला पसंती देणाऱ्या आलियाने लग्नाच्या खर्च कमी करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही जोडी जयपूरमध्ये पोहचली आहे. जयपूरमध्ये प्रसिद्धीवेळी राजस्थान पत्रिकाशी बोलताना आलियाने लग्नाचा खर्च कमी प्रमाणात करणे अशक्य असल्याचे म्हटले. लग्नामध्ये अनावश्यक खर्च करण्याच्या नव्या कायद्यासंदर्भात आलियाला प्रश्न विचारण्यात आला होता. या नव्या कायद्यानुसार, लग्नामध्ये पाच लाखापेक्षा अधिक खर्च करणाऱ्याने एका गरिब मुलीचे लग्न लावू द्यावे, असा प्रसाव काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांनी मांडला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना आलियाने लग्न कमी खर्चात करणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या घडीला पाच लाख रुपये फक्त वधूच्या कपड्यासाठी लागतात, असे आलिया म्हणाली.

भारतामध्ये काही लग्न समारंभांवर वारेमाप खर्च केला जातो. लाखो रुपयांची उधळपट्टी लग्न समारंभाच्या निमित्ताने पाहायला मिळते. अशा लग्न समारंभांना अंकुश लावण्यासाठी नवा कायदा येत आहे. ज्या लोकांना आपल्या घरातील लग्न-कार्यासाठी ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च करायची आहे त्यांना १० टक्के रक्कम गरीबांच्या मुलीच्या लग्नासाठी देणे बंधनकारक होणार आहे. काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांच्या पुढाकाराने हा कायदा येणार आहे. कायदा संमत होण्यापूर्वी आलियाने दिलेल्या उत्तरामुळे आलिया पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते.

सध्याच्या काळात लग्नकार्यावर अनावश्यक खर्च केला जात आहे. श्रीमंत लोक लग्नामध्ये खूप खर्च करतात त्यामुळे गरिबांवर दडपण येते. त्यांच्याकडून ही अशाच मोठ्या समारंभाची अपेक्षा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये या उधळपट्टीवर अंकुश लावणारा कायदा असावा, असे आम्हाला वाटले आणि या कल्याणकारी कायद्याच्या निर्मितीची कल्पना सूचली, असे रंजन यांनी म्हटले होते. मात्र आलियाने या प्रश्नावर दिलेले उत्तर हे आलियाच्या मनात गरिबांविषयी कोणतीही भावना नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.आलियाची नेहमीच तिच्या विनोदी बुद्दीने फजिती होताना दिसते. त्यामुळे आलियाला या प्रश्नातील गांभिर्य किती कळले, याबाबतही तर्कवितर्क रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या  चित्रपटामध्ये आलिया बद्रीच्या दुल्हनियाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये दुल्हनियाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आलियाने यापूर्वी तिला आयुष्य़ात हव्या असणाऱ्या जोडीदाराविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये आलियाने तिच्या भावी जोडीदार कसा असावा ही इच्छा बोलून दाखविली होती.