‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान यांच्या काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. किंबहुना या त्यांच्यात झालेल्या वादामुळे या दोघांनीही यापुढे एकमेकांसोबत कोणत्याही चित्रपटामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सलमान आणि कबीर खान त्यांच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. पण या चित्रपटानंतर हे दोघेही एकत्र दिसणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्पॉटबॉय. कॉम या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘सलमानचे चित्रीकरणानंतर मद्यपान करणे कबीर खान यांना कधीच रुचत नव्हते. सलमान बऱ्याचदा त्याच्या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान टीम मेंबर्ससोबत मद्यपान करतो. बराच काळ रंगलेल्या या मैफिलीनंतर सलमान झोपण्यासाठी जातो. पण, हा सर्व प्रकार रात्री उशीरापर्यंत चालल्यामुळे टीममधील सहकारी वेळेवर सेटवर पोहोचत नाहीत. ज्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. दिग्दर्शक कबीर खान सलमानच्या याच सवयीमुळे त्रस्त आहे. याप्ररकरणी कबीरने सलमानशी बोलून पाहिले. पण, यानंतर दोघांमध्येही या विषयावरुन शाब्दीक बाचाबाची झाली. ज्यानंतर सलमानने ‘ट्युबलाइट’नंतर कबीर खानच्या कोणत्याही चित्रपटामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही ‘वीर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबतही सलमानचे भांडण झाले होते. तसेच ‘दबंग’ या चित्रपटाच्या वेळीही दिग्दर्शक अभिनव कश्यपसोबत सलमानचे भांडण झाले होते. त्यामुळे येत्या काळात सलमान आणि कबीर या दोघांचेही धम्माल समीकरण एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
सलमान सध्या व्यग्र असणारा त्याचा आगामी ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सलमानसह चिनी अभिनेत्री झू झू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच अभिनेता सोहेल खानही या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक कबीर खानला त्याच्या आणि सलमानच्या वादाविषयी विचारले असता त्याने या बातमीला दुजोरा दिला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.