निवडणुकीचे वातावरण तापत चाललय. काही चित्रपट कलाकारांचाही त्यात सहभाग दिसतोय, अशा वेळेस अशाच एखाद्या सुपर स्टारच्या चक्क उमेदवारीने गाजलेल्या निवडणुकीची आठवण हवीच. ही निवडणूक आहे, १९८४ च्या अखेरीस पार पडलेली. तीदेखील लोकसभेची. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी निर्घृण हत्येनंतर काँग्रेसच्या वतीने देशभरात एकूण तीन चित्रपट कलाकारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडणुकीचा रंगच बदलला. वायव्य मुंबईतून सुनील दत्त, दक्षिण चेन्नईतून वैजयंतीमाला आणि इलाहाबादमधून अमिताभ बच्चन. गांधी कुटुंबाचा मित्र म्हणून अमिताभ या उमेदवारासाठी तयार झाला ही त्यावेळची पहिली बातमी होती. राजीव गांधींच्या मदतीसाठीचे त्याचे हे पाऊल या मुद्दयाने ही चर्चा आणखीन पुढे गेली. चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यमे व चित्रपट रसिक या तीनही ठिकाणी या सुपर स्टारची ही उमेदवारी गाजू लागली. यावरून स्वाभाविकपणे उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. कलाकाराने राजकारणात पडावे की नाही हा प्रश्न तेव्हाही गाजला. त्यात अमिताभचा सामना कसलेले राजकारणी समाजवादी पक्षाचे उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांच्याशी होता. त्यांना हमखास विजय देणारा हा मतदारसंघ. तेथे चित्रपट ताऱ्याचे काय काम हा पहिलाच प्रश्न. विरोधकांकडून प्रचाराला सुरुवात करताना अमिताभला विचारले गेले, 'मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है?' अमिताभला राजकीय वातावरण व मानसिकता अगदीच नवीन. इलाहाबादला त्याने मुक्काम ठोकत रोड शो, प्रचार सभा, आश्वासने हे सुरु केले. देशभरातील सर्व प्रसार माध्यमांसाठी हा मतदारसंघ खूपच महत्त्वाचा. त्यामुळेच तेथेच अनेक वृत्तपत्र प्रतिनिधींनी डेरा टाकला. अमिताभची प्रत्येक लहान मोठी गोष्ट बातमी होऊ लागली. प्रचार फेरीत त्याने कोणाशी शुध्द हिंदीत संवाद साधताच ती चौकटीची बातमी होऊ लागली. वातावरण काँग्रेसच्या बाजूने होत गेले. 'गंगा छोरा किनारेवाला' असा त्याचा प्रचार होऊ लागला. अमिताभ सुसंस्कृत असल्याने माध्यमांशी संवाद व जाहीर सभेतील आपले बोलणे याचा समतोल तो एव्हाना व्यवस्थित सांभाळू लागला. तरी, राजकारणात बोलताना-ऐकताना-सांगताना काही वेगळी हुशारी लागते यापासून अमिताभ तेव्हा काहीसा दूरच होता. काही का असेना प्रचारात रंग मात्र मस्त भरत गेला. इकडे त्याचे दिग्दर्शक मित्र मनमोहन देसाई अमिताभने राजकारणात जायला नको होते असे म्हणत असेपर्यंत तिकडे मतदान पार पडलेही. तो मतपत्रिकेचा काळ होता. त्यामुळेच त्याच्या मोजणीत कधी अमूक उमेदवार पुढे तर कधी उलट चित्र. पण इलाहाबाद लोकसभा मतदार संघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमिताभ आघाडीवर राहिला आणि खासदार अमिताभ बच्चन अशी त्याची तेव्हा नवीन ओळख झाली. दिलीप ठाकूर