पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये घालण्यात आलेल्या बंदीनंतर करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडलेला आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही बंदीचा इशारा दिल्यानंतर ‘ऐ दिल हे मुश्किल’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार लटकत आहे. दरम्यान, चित्रपटाला यूए सर्टिफिकेट मिळाल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग काहीसा मोकळा झाला आहे. त्यामुळे चित्रपटातील मुख्य कलाकार रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा हे चित्रपटाच्या प्रसिद्धीत गुंतले आहेत.

‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून त्यास काहीच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे चित्रपटाची स्टारकास्ट अगदी जोरात त्याची प्रसिद्धी करत आहे. कलाकारांना प्रसिद्धी कार्यक्रमात काय काय करावे लागते, याचे उदाहरण नुकतेच या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान पाहावयास मिळाले. कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. पण काहीवेळा त्यांच्या समोर अशा काही गोष्टी येतात ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. अभिनेत्री अनुष्का शर्मा हीला देखील अशाच काहीशा घटनेला सामोरे जावे लागले. रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्का हे ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या प्रसिद्धीकरिता  ‘ द कपिल शर्मा शो ‘ च्या सेटवर गेले होते. त्यावेळी अनुष्काच्या लग्नाच्या विषयावर बरीच चर्चा झाली. तेव्हा तेथे उपस्थित एका महिलेने अनुष्काला रणबीरसह लग्न करण्याचा सल्ला दिला. ‘तू रणबीर कपूरशी लग्न कर..’ यावर ती महिला सतत जोर देत होती. ‘मी तुझ्या आईसारखी आहे. त्यामुळे तू मी दिलेला सल्ला  ऐकावयास हवा’, असे उपस्थित महिला म्हणत होती. इतकेच नाही तर अनुष्कासाठी रणबीरच योग्य वर असल्याचे महिलेचे म्हणणे होते. जर त्या महिलेने हाच प्रश्न गांभीर्याने केला असता तर सेटवर वादळच आले असते. पण सदर महिलेने मस्करीत आपली इच्छा सांगितल्याने यावर अनुष्काकडे लाजण्याव्यतिरिक्त काहीच उत्तर नव्हते. मात्र तरीही अनुष्काने जोरात ओरडत मी या त्रासदायक रणबीरशी कधीच लग्न करणार नाही, असे म्हटले. ही संपूर्ण घटना घडत असताना रणबीर कपूर आणि कपिल शर्मा यांना हसू अनावर झाले.