बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी २००७ साली एका खासगी सोहळ्यात विवाह केला. या दोघांच्या लग्नाला नऊ वर्ष उलटली असून त्यांना आराध्या ही गोंडस मुलगी आहे. आराध्या तिच्या आईसह म्हणजेच ऐश्वर्यासह ब-याचदा दिसते. लवकरच ऐश्वर्या ही रणबीर कपूरसह ‘ऐ दिल है मुश्किल’  या चित्रपटात झळकणार आहे. रुपेरी पडद्यावर ऐश्वर्याच्या प्रियकराची भूमिका साकारणा-या रणबीरला आराध्या चक्क तिचा बाबा समजली. विशेष म्हणजे या घटनेचा उलगडा खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिनेच केला.

नुकतेच एका मासिकाकरिता रणबीर आणि ऐश्वर्याने हॉट फोटोशूट केले होते. या मासिकाच्याच मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने आराध्याकडून झालेल्या गोंधळाबाबत सांगितले. ऐश्वर्या म्हणाली की, आराध्या एकदा रणबीरला बाबा समजली होती. एकदा आराध्या जोरात धावत आली आणि रणबीरला बिलगली. त्यावेळी त्याने अभिषेकप्रमाणेच जॅकेट आणि टोपी घातलेली होती. आराध्याला वाटले की ते तिचे वडिल आहेत. पण जेव्हा तिने रणबीरचा चेहरा पाहिला तेव्हा ती गोंधळली. इतकेच नाही तर या दोघांचीही खूप चांगली मैत्री असल्याचेही ऐश्वर्याने सांगितले. आराध्या रणबीरला नेहमीच ‘आरके’ या नावाने हाक मारते, असेही ती म्हणाली

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि रणबीरच्या केमिस्ट्रीविषयी चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा रंगली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘बुल्लेया’ गाण्यातील या दोघांच्या जबरदस्त केमस्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने ‘जज्बा’ आणि ‘सरबजीत’ हे चित्रपट केले. पण लग्नानंतर कोणत्याच चित्रपटात ऐश्वर्याचा हॉट अंदाज पाहावयास मिळाला नव्हता. त्यानंतर आता ब-याच वर्षांनी ग्लॅमरस ऐश्वर्या पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चित्रपटाला विरोध केला जात आहे. तसेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना चित्रपट न दाखवण्याची धमकी दिली होती. नाहीतर मल्टिप्लेक्सच्या काचा महाग असतात हे त्यांनी विसरू नये, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच, चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर यालाही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर करणने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली होती. येत्या दिवाळीला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित होईल.