रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘तमाशा’ या शुक्रवारी प्रदर्शित झाला. इम्तियाज अलीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट किती चांगला आहे, त्याचा विषय काय वगैरे गोष्टी एरव्ही विचारात घेतल्या गेल्या असत्या. मात्र, ‘तमाशा’ प्रदर्शित व्हायच्या आधी आणि तो प्रदर्शित झाल्यानंतरही एकच चर्चा होती ती म्हणजे रणबीर आणि दीपिकाची जोडी या चित्रपटात कशी वाटते आहे, केवळ त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावरच्या या जोडय़ांबद्दल कायम आकर्षण राहिले आहे. अगदी राज कपूर-नर्गिस यांच्यापासून ते आत्ता रणबीर-दीपिकापर्यंत प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडय़ांनी प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र यावे, अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. मात्र, आत्तापर्यंत पडद्यावरच्या या लोकप्रिय जोडय़ा वास्तवात कधीही एकत्र नांदलेल्या नाहीत.. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘तमाशा’ हा एकत्र तिसरा चित्रपट. ‘बचना ऐ हसीनों’ या चित्रपटात ते दोघे पहिल्यांदा एकत्र आले. प्रेमातही पडले. पण, दुर्दैवाने त्यांचा दुसरा एकत्र चित्रपट ‘यह जवानी है दिवानी’ त्यांच्याकडे आला तो त्यांचा प्रेमभंग झाल्यानंतर.. दोघांनीही आपापले जोडीदार निवडून पुढची वाटचाल सुरू केली आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांमध्ये अजून प्रत्यक्ष आयुष्यातही रणबीर आणि दीपिका ही ‘एक दुजे के लिए’ बनलेली जोडी आहे, याचीच चर्चा सुरू असते. ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्याच वेळी या जोडीला एकत्र घेऊन चित्रपट करायचा, असा विचार इम्तियाजने केला होता. ‘तमाशा’ या चित्रपटातून त्याने तो ताबडतोब अमलातही आणला. मुळात, ‘तमाशा’च्या दिग्दर्शकानेच हा चित्रपट या जोडीची केमिस्ट्री लक्षात घेऊन केला होता. त्यामुळे हा चित्रपट चांगला की वाईट?, याहीपेक्षा रणबीर-दीपिकामधली केमिस्ट्री हेच प्रेक्षकांसाठीही मोठे आक र्षण ठरले आहे. अगदी पहिल्या तासाभरात कथेमुळे का होईना या जोडीला एकत्र प्रेम करण्याची संधी दिग्दर्शकाने दिलेली नाही, म्हणूनही खंत व्यक्त झाली आहे. बॉलीवूडमध्ये अशा जोडय़ा नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. राज कपूर-नर्गिस, राजेश खन्ना-शर्मिला टागोर, अमिताभ बच्चन-रेखा, शाहरूख-काजोल असा हा जोडय़ांचा प्रवास रणबीर-दीपिकापर्यंत येऊन थांबला आहे. मात्र पूर्वीपेक्षा फार कमी जोडय़ा अशा पद्धतीने प्रसिद्ध होताना दिसतात. शाहरूख खान आणि काजोल ही जोडी आजच्या काळातील आत्तापर्यंतची सर्वात प्रसिद्ध जोडी मानली जाते. ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ असे अनेक यशस्वी चित्रपट देणारी ही जोडी आजही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला पार ‘दिलवाले..’ स्टाइल प्रेमिकांच्या रूपात पडद्यावर आणण्याचा मोह दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही आवरता आला नाही. या दोघांना जे प्रेम मिळाले ते त्यांच्या काळातील अन्य कोणत्याही कलाकारांना मिळाले नाही. त्यानंतरच्या पिढीत रणबीर-दीपिकाचाच क्रमांक लागतो. चित्रपट यशस्वी होण्यासाठीच्या अनेक फु टपट्टयांमध्ये चित्रपटातील मुख्य जोडीमधली केमिस्ट्री हा आजही शंभर टक्के यशस्वी उपाय समजला जातो. यात प्रेक्षकांच्या मनात जशा जोडय़ा ठरलेल्या असतात, तशाच त्या दिग्दर्शकांच्या मनातही असतात. दीपिका आणि रणवीर सिंग खऱ्या आयुष्यात एकत्र आले. त्याचा उपयोग दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘राम लीला’ चित्रपटासाठी करून घेतला. त्या चित्रपटाला चांगले यश मिळाल्यानंतर याच जोडीच्या केमिस्ट्रीचा वापर करून ‘बाजीराव मस्तानी’ हे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे, असा निर्धार भन्साळींनी केला. त्यांच्या मते या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाने अर्धे काम फ त्ते करून ठेवले आहे. त्यांना कथेच्या रूपाने कसा आकार द्यायचा, हे दिग्दर्शकाचे कसब असते. पण, भन्साळींना आवडणारी ही जोडी प्रत्यक्षात प्रेक्षकांना फारशी रुचत नाही. त्यांना पडद्यावर आणि पडद्याबाहेरही दीपिकाने रणवीरला डच्चू देऊन रणबीरबरोबर एकत्र यावे, असेच वाटते. प्रेक्षकांच्या मनातील या जोडय़ांनी कधी दिग्दर्शकाचे काम फत्ते केले आहे तर कधी जोडी जमलीच नाही म्हणून चित्रपट आपटलेही आहेत. शाहरूख आणि काजोल दोघेही विवाहित आहेत, त्यांचे वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्य फार वेगवेगळे असले तरी पडद्यावर ते दोघे एकत्र आले की काय होते, हे सांगू शकत नाही. म्हणजे नेमकी त्यांच्यातील नात्याची जादू काय आहे, हे दिग्दर्शक म्हणून आपल्यालाही समजलेलं नाही, असं दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणतो. पण, त्यांच्या एकत्र येण्यातील गंमत प्रेक्षकांना भावते आणि दिग्दर्शकालाही अशा जोडीबरोबर काम करताना एक मजा येते, असे रोहितला वाटते. त्यामुळे कित्येक चित्रपट हे या जोडय़ांवर चाललेले आहेत. अमिताभ-रेखा यांच्या जोडीने कितीतरी सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना-शर्मिला टागोर ही जोडी आजच्या पिढीलाही त्यांच्या चित्रपटांची भुरळ पडते. बऱ्याचदा ठरावीक काळासाठी म्हणूनही काही कलाकार एकत्र येतात आणि त्यांची जोडी जमते. अगदी आत्ताही ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून एकत्र आलेल्या सिध्दार्थ मल्होत्रा आणि अलिया भट्ट या दोघांनी पुन्हा एकत्र यावे, अशी कित्येकांची इच्छा आहे. सध्या या दोघांमध्ये ‘कुछ कुछ..’ सुरू असल्याची चर्चा उघड झाल्यापासून तर त्यांच्या एकत्र चित्रपटाची मागणी वाढते आहे. ‘आशिकी २’ची जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांबद्दलही तशीच चर्चा सुरू आहे. मात्र त्या दोघांनीच एकत्र चित्रपट करणे जाणीवपूर्वक टाळले होते. दीपिका आणि रणबीर कपूर यांनी मात्र वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवत एकत्र काम करण्याला पसंती दिली आहे. या जोडीनंतर अशीच जोडी आणखी पुढच्या पिढीतही असेल का आणि असेल तर ती कोणती याची उत्सुकता कायम राहणार आहे.