बॉलीवूडमधील कोणत्याही क्षेत्रातील सेलेब्रिटी हे समाजातील सर्वसामान्यांचे ‘आदर्श’ असतात. त्यांची एखादी कृती किंवा वक्तव्य समाजावर परिणाम करून जाते किंवा मोठे वादळ निर्माण करते. आपल्या ‘सेलेब्रिटी’ प्रतिमेमुळे आपले बोलणे सोशल मीडिया आणि अन्य प्रसारमाध्यमांतून वाऱ्याच्या वेगाने पसरून त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे या मंडळींना माहिती नसेल असे म्हणणे किंवा मानणे हा दुधखुळेपणा ठरेल. कसलेल्या राजकारण्यांप्रमाणेच ही मंडळी आपली वाक्ये पेरत असतात. वाद निर्माण होऊन प्रसिद्धीचा सर्व झोत फक्त आणि फक्त आपल्यावरच राहील याचीही व्यवस्था त्यांनी केलेली असते. ‘उचलली जीभआणि लावली टाळ्याला’ असे करणाऱ्या या मंडळींना खरे तर ‘सेलेब्रिटी ‘राज’कारणी’ म्हटले पाहिजे.. कुठे, केव्हा, कधी आणि काय बोलावे या पेक्षा ‘काय बोलू नये’हे कळणे महत्त्वाचे असते. पण ते कळले असते तर ही मंडळी ‘सेलेब्रिटी’ कशी ठरली असती. रुपेरी पडदा आणि सातत्याने ‘पेज थ्री’वर राहणाऱ्या या मंडळींना प्रसिद्धीची नशा आणि सोसही असतो. त्यामुळे येनकेनप्रकारेण सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे या सेलेब्रिटींनाही हवे असते. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारीही असते. मग यातूनच त्यांची एखादी कृती किंवा वक्तव्य अनेक दिवस चर्चेत राहते. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमातून त्याचे पडसाद उमटत राहतात. आपल्या बोलण्याचा किंवा केलेल्या कृतीचा समाजावर आणि एकूणच सगळ्यावर त्याचे काय परिणाम होतील याची पूर्ण कल्पना या सेलेब्रिटींना असते आणि तरीही कोणतेही भान, तारतम्य न ठेवता ही मंडळी ‘उचलली जीभआणि लावली टाळ्याला’ असे नेहमीच करत असतात. सलमानचे ‘ट्वीट’ १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या संदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेले वादग्रस्त ‘ट्वीट’ त्याच्या चांगलेच अंगाशी आले होते. मध्यरात्री अवघ्या एका तासात त्याने १४ ‘ट्वीट’ या संदर्भात केली होती. ‘एका निष्पापाला फाशी देणे म्हणजे मानवतेची हत्या असून याकुबच्या ऐवजी त्याचा भाऊ आणि बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याला फाशी द्यावी’ असे ‘ट्वीट’सलमानने केले होते. त्याच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठले. राजकीय पक्षांनीही सलमानवर टीकेची झोड उठवली. अखेर सलमानने त्याचे वडील सलीम खान यांच्या कानपिचक्या मिळाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत आपले हे ‘ट्वीट’ मागे घेतले होते. नाही म्हटले तरी सलमान खान हा नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. मग ती काळविटांची शिकार असो किंवा पदपथावर झोपलेल्या निष्पाप माणसांना गाडीखाली चिरडण्याची घटना असो. ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी सलमान खान याला शिक्षा सुनाविल्यानंतर बहुसंख्य बॉलिवूड सेलेब्रिटींनी सलमानची बाजू घेत त्याला सहानुभूती दाखविली होती. या वेळी गायक अभिजित यांनी ‘ट्वीटर’वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादळ उठले होते. ‘पदपथावर झोपण्याची फारच हौस असेल तर अशा लोकांनी गावी जावे. जिथे कोणाचीही गाडी अंगावर येणार नाही’. आणि हे काहीच नाही तर यापुढे जाऊन अभिजितने ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्यासारखेच मरण येणार. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते म्हणून मी काही रस्त्यावर झोपलो नाही’ अशी मुक्ताफळेही उधळली होती. मंगेशकर भगिनींचीही वादग्रस्त विधाने मुंबईच्या हाजीअली, पेडर रोड (गोपाळराव देशमुख मार्ग) येथील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तसेच येथील वाहूतक सुरळीत सुरू राहण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते, पण पेडर रोडवर राहणाऱ्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी त्याला ठाम विरोध केला. हजारो वाहनचालकांची सोय यामुळे होणार होती. त्याकडे दुर्लक्ष करून आणि त्याविषयी कसलाही विचार न करता ‘हा उड्डाणपूल झाला तर मी दुबईला निघून जाईन’ असे वक्तव्य आशा भोसले यांनी केले होते. आशा भोसले यांच्या या वक्तव्यावरही त्या वेळी जोरदार टीका झाली होती. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त दर वर्षी विविध पुरस्कार देण्यात येतात. यात सवरेत्कृष्ट नाटकासाठीचाही पुरस्कार असतो. एका वर्षी ‘यंदा पुरस्कारासाठी एकही नाटक लायक न वाटल्यामुळे आपण हा पुरस्कार देणार नाही’ असे दस्तुरखुद्द लता मंगेशकर यांनीच जाहीर केले आणि नव्या वादाला तोंड फुटले होते. या पुरस्कारासाठी परीक्षकच नेमले गेले नव्हते तरी एकही नाटक लायक नाही, असे विधान लता मंगेशकर यांनी का केले?, अशी चर्चा तेव्हा रंगकर्मीमध्ये रंगली होती. मल्टिप्लेक्समध्ये मराठी आणि शोभा डे मल्टिप्लेक्समधील किमान एका पडद्यावर ‘प्राइमटाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखवण्यात यावा, अशी सक्ती करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात लेखिका आणि ‘पेज थ्री’वरील सेलेब्रिटी शोभा डे यांनी केलेल्या विधानावरून संताप व्यक्त करण्यात आला होता. ‘या पुढे मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न बंद होणार, फक्त दही-मिसळ आणि वडा-पाव मिळेल’असे वक्तव्य ‘ट्वीटर’वरून केले होते. ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि नाटककार दिवंगत विजय तेंडुलकर यांच्या एका जाहीर विधानावरूनही काही वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. एका मुलाखतीत तेंडुलकर यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ‘मला कोणी बंदूक आणून दिली तर मी मोदींना गोळ्या घालेन,’ असे उत्तर त्यांनी दिले होते. तेंडुलकर यांच्या या वक्तव्याचे पडसाद दीर्घकाळ उमटले होते. सेलेब्रिटी आणि वाद समीकरण सेलेब्रिटी आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे. काही जण बोलल्यामुळे तर काही जण न बोलल्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. खरे तर समाजातील आपले स्थान आणि आपल्या कृतीचा किंवा वक्तव्याचा होणारा परिणाम, त्याचे दूरगामी उमटणारे पडसाद लक्षात घेऊन कुठे, केव्हा, कधी आणि किती बोलावे, याचे भान या मंडळींनी बाळगणे आवश्यक आहे, पण आपल्याकडे ते घडताना दिसत नाही. येनकेनप्रकारेण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते एक सोपे तंत्र झाले आहे. असे वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी कोणतेही तारतम्य बाळगले जात नाही. आपले वक्तव्य अंगाशी येतेय म्हटल्यानंतर ‘पडलो तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे आपण तसे बोललोच नाही, माझ्या विधानाचा अर्थ चुकीचा काढला, त्याचा विपर्यास केला गेला अशा शब्दांत सारवासारव केली जाते. पण वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आणि परिणाम उमटण्यापेक्षा ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’असे जर केले नाही ते सगळ्यांसाठीच जास्त चांगले नाही का? सेलेब्रिटी याचा कधी तरी गांभीर्याने विचार करणार आहेत का? की मागल्या पानावरून पुढच्या पानावर असेच सुरू राहणार आहे.