एका संगीत नाटकातील मुख्य भूमिकेसाठी त्यांची निवड झाली होती. नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. पण संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांनी नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. तसे घडले नसते तर मराठी संगीत रंगभूमीला एक चांगला अभिनेता-गायक मिळाला असता. लहानपणी गावात भजनाचे कार्यक्रम करणाऱ्या त्यांनाही भविष्यात शास्त्रीय व नाटय़ संगीत हाच आपला श्वास आणि ध्यास होईल असे वाटले नव्हते. पण जिद्द, परिश्रम, रियाज आणि गुरुंचे आशिर्वाद यामुळे ज्यांनी शास्त्रीय व नाटय़संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले ते ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर कारेकर आजच्या पुनर्भेटचे मानकरी आहेत.

आपण अभिनेते होता होता कसे राहून गेलो याविषयी बोलताना पं. कारेकर म्हणाले, शास्त्रीय गायन, नाटय़संगीत आणि मैफलींमुळे नाव झाल्यानंतर मला ही संधी चालून आली होती. विद्याधर गोखले लिखित ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मी ही हो म्हटले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. पण त्याच वेळी केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मला मिळाली. केंद्र शासनाची ती शिष्यवृत्ती मानाची समजली जाते. शिष्यवृत्ती की नाटक यापैकी एकाची निवड मला करायची होती आणि मी शिष्यवृत्ती स्वीकारायचे ठरवले. गोखले अण्णांना तसे सांगितले. सुरुवातीला ते रागावले. मग तुम्हीच सांगा मी काय करू?, असा प्रश्न त्यांना केल्यानंतर मी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनीही स्वागत केले. त्यानंतर संगीत नाटक आणि अभिनय सुटला तो सुटला. पुन्हा काही त्याकडे वळलो नाही. पुढे शास्त्रीय व नाटय़ संगीत गायन यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि माझ्याकडून उत्तमात्तील उत्तम असे गाणे रसिक श्रोत्यांना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, असं ते म्हणतात.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

कारेकर हे मुळचे गोव्याचे. म्हापसा हे कारेकर कुटुंबियांचे मूळ गाव. पण कारेकर कुटुंबीय मडगाव येथे स्थायिक झाल्याने प्रभाकर कारेकर यांचे शालेय शिक्षण मडगावच्या नोवेरा हायस्कूल येथे झाले. कारेकर यांच्या घराण्यात गाणे नव्हते किंवा गाण्याचा पिढीजात वारसाही त्यांना लाभला नाही. पण प्रभाकर कारेकर यांचे वडील जनार्दन कारेकर यांना गाण्याची हौस व आवड होती. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. गावातील मंडळीही त्यात सहभागी असायची. भजनाच्या त्या कार्यक्रमात पं. कारेकरही सहभागी होत असत. पण पुढे गाणे हाच आपला श्वास व ध्यास होणार आहे याची त्यांना स्वत:लाही कल्पना नव्हती.

आयुष्यात गाणे कसे आले, या बाबतच्या आठवणीला उजाळा देताना पं. कारेकर यांनी सांगितले, एकदा वर्गात  बसलो असताना त्या बेंचवर हाताने काहीतरी वाजवत होतो. आमच्या शिक्षकांनी ते पाहिले आणि शाळेत शिकायला येतो की बाकडे वाजवायला?, अशा शब्दांत मला खडसावले. पण त्यांनी ते बरोबर लक्षात ठेवले आणि पुढे त्यांनीच ‘काय रे घरी भजने म्हणतोस ना, मग शाळेच्या स्नेहसंमेलनात गाणी म्हणशील का?’, असे विचारले. मला हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता. पं. सुरेश हळदणकर यांनी गायलेली दोन नाटय़पदे मी तयार केली. ती गायलो आणि श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वन्स मोअरही घेतला. मडगावातील काही प्रतिष्ठित मान्यवरही या स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. त्यांनी माझ्या वडिलांना हा खूप छान गातो, त्याला गाणे शिकवा, असे सांगितले. स्नेहसंमेलनातील माझ्या त्या गाण्यांमुळे मला गोव्यात होणाऱ्या विविध उत्सवातून भजने गाण्यासाठी लोक बोलवायला लागले. हा गाणे चांगले गातो तर त्याला मुंबईला पाठवा, असेही काही परिचितांनी वडिलांना सांगितले. मी आणि माझा मोठा भाऊ नारायण आम्हा दोघांना मुंबईला पाठवायचा प्लॅन वडिलांनी तयार केला. गोव्यात तेव्हा पोर्तुगीजांची राजवट होती. त्यामुळे गोव्याची हद्द ओलांडून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करणे मोठे कठीण होते. पण वडिलांनी नियोजनानुसार सर्व सुरळीत पार पाडले आणि वडिलांसह आम्ही बेळगावमार्गे मुंबईत पोहोचलो. वडिलांचे एक मित्र माहिमला राहात होते. आमची दोघांची राहण्याची सोय तिथे झाली. जरा स्थिरस्थावर झाल्यानंतर वडील मला पं. सुरेश हळदणकर यांच्याकडे घेऊ न गेले. माझ्या मुलाला तुम्ही शिकवावे, अशी विनंती वडिलांनी हळदणकर यांना केली. त्यांनी माझे गाणे ऐकले आणि मी याला शिकवेन, असे त्यांनी वडिलांना सांगितले. अशा प्रकारे पं. सुरेशबुवांकडे माझे गाण्याचे शिक्षण सुरु झाले. एके दिवशी मी कुठे राहतो?, असे त्यांनी विचारल्यावर माहीमला असे उत्तर दिले. त्यावर उद्यापासून आमच्या घरी राहायला यायचे, असा प्रेमळ आदेशच त्यांनी दिला. दहा वर्षे त्यांच्याकडे राहून मी गाणे शिकलो. या काळात शास्त्रीय गायन ऐकायला व शिकायला मिळाले. पं. हळदणकर हे नाटकातूनही काम करत असत. शास्त्रीय संगीताच्या मैफलीही व्हायच्या. त्यांच्या मैफलीत तंबोरा धरायचीही संधी मला मिळाली. त्यानंतर पं.जितेंद्र अभिषेकी यांच्याकडेही शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. पं. अभिषेकी बुवांकडे मी नऊ  वर्षे शिकलो. त्यानंतर पं. सी. आर. व्यास यांच्याकडेही काही वर्षे गाणे शिकलो. त्यांची गायन शैली वेगळी होती. व्यास बुवांकडेही भरपूर राग, ठुमरी, भजने शिकायला मिळाली. पं. हळदणकर व पं. अभिषेकी या दोघांचीही गाण्याची शैली भिन्न होती. अभिषेकी बुवांचे गाणे गंभीर, शांत तर हळदणकर बुवांचे गायन तडफदार होते. पं. हळदणकर, पं. अभिषेकी, पं. व्यास या तीनही गुरुंकडून जे घेतले, शिकलो त्याला प्रचंड रियाजाची जोड देत माझा अभ्यास सुरु ठेवला व माझी वेगळी शैली निर्माण केली.

परमेश्वर किंवा नियती काहीतरी ठरवते आणि योग्य वेळ येताच ते आपल्याला मिळते. माझ्या बाबतीतीतही तसे झाल्याचे सांगून कारेकर म्हणाले, गाण्याचे शिक्षण झाल्यानंतर छोटे-मोठे गाण्याचे कार्यक्रम, मैफली करायला सुरुवात केली होती. गणेशोत्सवातही कार्यक्रम व्हायला लागले. मला आठवतेय माझी पहिली जाहीर मैफल ठाण्याला झाली होती. त्या कार्यक्रमाची बिदागी मला किती मिळाली असेल?, सांगितले तर खरे वाटणार नाही. अवघे शंभर रुपये माझे पहिले मानधन होते. कार्यक्रम, मैफली करत होतो. लोकांना माझे नाव माहिती झाले पण म्हणावी अशी खास अशी संधी अजूनही मिळाली नव्हती. पण ती संधी माझे मित्र लालजी देसाई आणि पु. ल. देशपांडे यांच्यामुळे मला मिळाली. पुल यांनी ‘शाकुंतल ते सौभद्र’ असा एक कार्यक्रम बसवला होता. पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे आणि अन्य काही दिग्गज गायक या कार्यक्रमात गाणार होते. लालजीनी पुलंना माझे नाव सुचविले आणि प्रभाकरलाही या कार्यक्रमात  संधी द्यावी, अशी विनंती केली. पुलंनी भेटायला बोलावले व काही गाऊ न दाखवायला सांगितले. पुलंना माझे गाणे आवडले आणि तुला या कार्यक्रमात घेतले, असे सांगितले. ‘प्रिये पाहा’ व ‘नच सुंदरी करु कोपा’ अशी दोन नाटय़पदे मला म्हणायची होती. स्वत: पुलंनी ती गाणी माझ्याकडूनच बसवून घेतली. रवींद्र नाटय़ मंदिरात कार्यक्रम होता. भाऊ साहेब बांदोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात माझे गाणे सगळयात शेवटी ठेवले होते. ‘प्रिये पाहा’ या नाटय़पदाला एक तान घेतली आणि टाळ्यांचा जो काही कडकडाट झाला त्यातच मला गाण्याची पावती मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर बांदोडकर यांनी खूप छान गायलास, असे सांगून कौतुक केले. त्यानंतर मी मूळचा गोव्याचा आहे हे त्यांना कळल्यानंतर पुढे आमचा स्नेह अधिक वृद्धींगत झाला.

पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात गाणे सादर करायला मिळणे हा मोठा बहुमान असतो.  एका वर्षी कारेकर यांना ती संधी मिळाली. रात्री अकरा वाजता गाणे होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी काही राग तयार केले. पण पहाटेचे दोन वाजले तरी त्यांचा नंबर काही लागला नाही. पहाटे चार वाजता आता तुम्हाला बसायचे आहे, असा निरोप त्यांना दिला गेला आणि त्यांनी पूर्ण तयारीनीशी राग ‘अहिर भैरव’ गायला सुरुवात केली. आप्पा जळगावकर (संवादिनी) व चंद्रकांत कामत (तबला) हे त्यांना संगीतसाथ करत होते. राग गायनानंतर आप्पांनी कारेकर यांना एखादे नाटय़पद म्हणायला सांगितले. कारेकर यांनी ‘प्रिये पाहा..’ म्हणायला सुरुवात केली आणि ते ही गाणे रंगले. रसिकांनी छान प्रतिसाद दिला. सवाई गंधर्व महोत्सवातील या संधीने त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली.

‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.पं. हळदणकर, पं. अभिषेकी व  पं. व्यास बुवा असे तीन गुरु कारेकर यांना लाभले. त्या सर्वाचे कारेकर यांच्या आयुष्यात महत्वपूर्ण स्थान आहे. या तीनही गुरुंच्या प्रती आदर आणि कृतज्ञता म्हणून ते दरवर्षी शास्त्रीय गायन आणि वादनाचा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम करतात. कारेकर यांनी स्थापन केलेल्या ‘स्वरप्रभा विश्वस्त न्यास’तर्फे गेली १६ वर्षे हा सांगितिक आदरांजलीचा कार्यक्रम होत आहे. अनेक दिग्गज गायक व वादकांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावली आहे.

संगीत हे संगीत आहे. एखादा राग दीर्घकाळ गाऊ नही रसिकांना आनंद देता येतो आणि तीन मिनिटांच्या गाण्यातूनही गायक तेवढाच आनंद रसिकांना देतो. पण शास्त्रीय संगीत सर्व संगीताचे मूळ आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था प्रयत्न करत आहेतच पण त्याला राज्य व केंद्र शासनाचीही साथ मिळाली पाहिजे. सध्याच्या वाहिन्यांवर गाण्याच्या कार्यक्रमांचे किंवा नृत्याचे ‘रिअ‍ॅलिटी शो’ होतात तसे फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेले रिअ‍ॅलिटी शो झाले पाहिजे, असे पं. कारेकर सांगतात.  मध्य प्रदेश शासनाचा मिळालेला ‘तानसेन’ पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमीचा जाहीर झालेला पुरस्कार हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे त्यांना वाटते. आजवर शास्त्रीय संगीत व नाटय़संगीत क्षेत्रात मी जे काही थोडेफार काम केले त्याची ही पावती असल्याचे कारेकर यांनी सांगितले.

वयाच्या ७४ व्या वर्षांत असलेल्या पं. कारेकर यांनी आता वयोपरत्वे कार्यक्रम व मैफली कमी केल्या आहेत. तरुण पिढीला आणि लहान मुलांना शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन ते करतात. घरी शिकवणी वर्गही घेतात. पत्नी प्रतिभा, एक मुलगी, दोन पुत्र, सुना, जावई व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात रियाजाला खूप महत्व आहे. तो प्रचंड करा आणि तुमच्या गुरुंवर श्रद्धा ठेवा, असा सल्ला ते या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला देतात.

आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना मनात काय भावना आहेत, असे विचारले असता कारेकर म्हणाले, संगीताने मला जे काही दिले, मिळाले, त्यात मी समाधानी, आनंदी व कृतार्थ आहे. आजवर संगीत जगलो, जगत आहे आणि यापुढेही जगणार आहे. संगीत हाच माझा श्वास आणि ध्यास आहे.