आपल्याकडे आज संवादाची माध्यमे वाढली आहेत मात्र संवाद हरवला आहे, एका चौकटीत राहूनही आपण एकमेकांशी जोडलेले नसतो आणि तिसऱ्या व्यक्तीशी अभासी माध्यमातून संवाद साधतो, ही आजची परिस्थिती आहे. यामुळेच 'ब्लू व्हेल' सारखा गेम आपल्या मनावर राज्य करतो असे दिसते. आपल्या मनातील 'ब्लू व्हेल'शी सामना करण्यासाठी संवादाची माध्यमे वाढली पण, खरंतर आपल्यातील संवादच संपत चालला आहे असे का? याचा विचार करण्यासाठी 'कासव' चित्रपट बघायलाच हवा असे मत 'विजयगाथा कासवाची' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि कलासंस्कृती परिवार यांच्या वतीने सुवर्णकमळ विजेत्या 'कासव' चित्रपटाच्या टीमचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार आणि 'विजयगाथा कासवाची' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादामध्ये चित्रपटाचे निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर, अभिनेता आलोक राजवाडे यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. वाचा : फक्त एका क्लिकवर मनोरंजन क्षेत्रातील १० मोठ्या घडामोडी डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, शाळा - कॉलेजच्या फॉर्मल शिक्षणात फक्त बौद्धिक विकासावर भर दिला जातो. यामुळे अनेकांचा मानसिक विकास झालेलाच असतो असे नाही. अलिकडे माहितीची उपलब्द्धता वाढल्याने अनुभवाशिवाय सर्वकाही मिळते. पूर्वी अनुभव आणि माहिती भावंडाप्रमाणे एकत्र येत असत, आता क्रम बदलला आहे, यामुळे चांगुलपणा शब्दात असला तरी कृतीशिलतेत त्याचा अनेकदा अभाव जाणवतो. शब्दांच्या भाषेपलीकडे आपल्याला शिकायला मिळत नाही. यामुळे बुद्धी सुजली आहे आणि भावनांची बोंब झाल्याचेही, त्यांनी नमूद केले. समाजाच्या जवळ जात समाजाचे शिक्षण घडवणार, ही भुमिका चित्रपट माध्यमात वावरणाऱ्यांची असायला हवी असे सांगत सुमित्रा भावे म्हणाल्या, समाजप्रबोधनासाठी सिनेमा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. कारण यातून सामान्य माणसाला त्यांच्या भोवतीच्या समस्यांचा अनुभव मिळतो आणि त्यातून ते जागृत होतात. अलिकडे तरूणांमध्ये वाढते नैराश्य ही समस्या समाजाला भेडसावत आहे. त्यावर आम्ही आशादायक दिशा सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा : जाणून घ्या, जेनेलिया-रितेश देशमुखच्या 'फास्टर फेणे'ची कथा सुकथनकर म्हणाले की, कोणताही चित्रपट हा समाजातील प्रश्नांवर तोडगा सुचवू शकतोच असे नाही, मात्र सर्वकाही गुडीगुडी, ग्लॅमरस न दाखवता या माध्यमातून सकारात्मक मार्ग दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिकिटबारीवरचा बाजार वेगळा आणि कलात्मक सिनेमाचा प्रेक्षक वेगळा याची जाणिव आम्हाला आहे यामुळे सुवर्णकमळची मोहोर सुखद नक्कीच आहे. मात्र, आम्ही जिथे चित्रपट संपवला, तिथपासून आपला प्रवास खऱ्या अर्थाने सूरू झाला आहे असे मला वाटते. येत्या ६ ऑक्टोबरला मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील १८ चित्रपटगृहांमध्ये 'कासव' प्रदर्शित होईल.