एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली २’  चित्रपटाची आतुरता आता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. आगामी ‘बाहुबली २’ चित्रपटातून या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कटप्पाने म्हणजेच सत्यराजने बाहुबली अर्थात प्रभासला मारण्याचे हटके उत्तर दिले. या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रविवारी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘बाहुबली २’ प्री रिलीज शो ‘चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सत्यराजने बाहुबलीला मारल्याचे कारण सांगितले.

या कार्यक्रमात सत्यराज जेव्हा व्यासपीठावर आला. त्यावेळी संपूर्ण देशाला पडलेला प्रश्न त्याला विचारण्यात आला. चित्रपटाच्या पहिल्या भागात तू बाहुबलीला का मारलेस? हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. देशातील तमाम चित्रपटचाहत्यांना सतावणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर देताना सत्यराज म्हणाला की, “निर्माता शोबू आणि प्रसाद सर यांनी मला चित्रपटासाठी चांगले पैसे दिले. तसेच एस एस राजमौली यांनी मला बाहुबलीला मारण्यास सांगितले. त्यामुळे मी बाहुबलीला मारले.” तो पुढे म्हणाला की. ” मिर्ची या चित्रपटापासून प्रभास मला प्रिय वाटतो, त्यामुळे त्याला मारण्याचे माझ्या मनात कधीच आले नव्हते.” २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिर्ची या चित्रपटात प्रभास आणि सत्यराज यांनी एकत्र काम केले होते.

‘बाहुबली’मध्ये कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराजने दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन बाहुबलीला मारल्याचे सांगितल्यानंतर चित्रटाच्या दिग्दर्शकाला देखील हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राजमौली या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, “मला चित्रपटाचा शेवट हा आश्चर्यकारकरित्या करायचा होता. या सीनमध्ये ती क्षमता होती. मात्र, प्रेक्षकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहुबलीला मारल्याची उत्सुकता निर्माण होईल, असे वाटले नव्हते.”

कट्टपाने बाहुबलीला का मारले? हा प्रश्नाचा चांगलाच गाजावाजा झाल्याचे पाहायला मिळाले होते. आगामी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटात या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्यामुळे पहिल्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटालाही तुफान प्रतिसाद मिळेल, असा या चित्रपटाच्या निर्मात्यांसह चित्रपटसृष्टीतील जाणकारांचा अंदाज आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.