दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला सध्या फोनचा फार त्रास होत आहे. आश्चर्य म्हणजे त्याला येणारे फोन हे ‘बाहुबली’ या सिनेमातील त्याच्या अभिनयाची प्रशंसा करणारे नाही आहेत. तर लोकांना त्याच्याकडून एक खास गोष्ट हवी आहे. त्याच्या चाहत्यांना ‘बाहुबली- द बिगिनिंग’ या सिनेमात अमरेंद्र बाहुबलीने वापरलेली एक गोष्ट हवी आहे.

दोन वर्षांपूर्वी ‘बाहुबली’ या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने एकाअर्थी इतिहास घडवला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच प्रेक्षकांना यातील एक गोष्ट स्वतःकडे हवी असे वाटते आहे. ती गोष्ट म्हणजे बाहुबलीने अर्थात प्रभासने सिनेमात घातलेले कवच. लोकांनी आता हे कवच विकत घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळेच प्रभासला हे कवच विकण्यासाठी दररोज कित्येक फोन येत आहेत. प्रभासच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रभासला हे कवच विकण्या संदर्भातच अनेक फोन येतात. तब्बल पाच वर्ष प्रभास, ‘बाहुबली ‘या सिनेमाशी जोडला गेला होता. त्यामुळे हे कवचही त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे.

फक्त प्रभासकडेच नाही, तर ‘बाहुबली’ या सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्याकडेही यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. हे कवच खास ‘बाहुबली’ या सिनेमासाठी बनवण्यात आले होते. त्यामुळेच ‘बाहुबली’ सिनेमाचे निर्माते त्याबद्दल अधिक माहिती देत नाहीत. लोक अनेकदा हे कवच विकत घेण्याची इच्छा व्यक्त करतात तसेच सतत कोणत्या बाजारात असे कवच विकत मिळेल याबद्दलची चौकशीही करतात.

‘बाहुबली’ सिनेमाच्या पहिल्या भागाने २०१५ मध्ये बॉक्स ऑफिसवर राज्य केले होते. याच सिनेमाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बाहुबलीच्या चाहत्यांना कवच मिळेल की नाही ते सांगणे कठीण असले तरी त्यांना काही महिन्याने कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर मात्र नक्कीच मिळणार.