आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी चित्रपटासाठी गाणं गाऊन अनेक वर्षे उलटली. पण, विद्या बालनच्या आगामी 'बेगम जान' या चित्रपटातील गाण्याद्वारे पुन्हा एकदा आशाजींच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे. 'बेगम जान'मधील पहिलेवहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, 'प्रेम में तोहरे' असे या गाण्याचे बोल आहेत. प्रेम में तोहरे गाणे आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. बॉलिवूडमध्ये आता अशी गाणी बनणे बंदच झाली आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रेम आणि यातना यावर आधारित असलेले हे गाणे आयुष्याची सफर घडवते. गीतकार कौसर मुनीर याच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्यास अनू मलिकने संगीत दिले आहे. आशाजींनी २०१३ साली चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले होते. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी 'बेगम जान'च्या निमित्ताने चित्रपटामध्ये त्यांचा सुरेल आवाज आपल्याला ऐकण्यास मिळत आहे. याविषयी अनू मलिक म्हणाले की, माझी तब्येत ठिक नव्हती म्हणून आशाजी मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी मला त्यांच्यासोबत काम करायचे असल्याचे मी माझ्या पत्नीला सांगितले. इतकेच नव्हे तर चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यालादेखील याबाबत काहीच माहिती नव्हती. मी आयसीयूमधूनच श्रीजितला फोन केला आणि पुढच्या दहा दिवसांत काम सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गाण्याची धून रेकॉर्ड करून हे गाणे आशाजी गातील, असे मी त्याला सांगितले. त्यालादेखील ही कल्पना आवडली. यानंतर जराही वेळ न दवडता मी आशाजींना फोन करून माझ्या घरी येण्यास सांगितले. गाण्याची धून ऐकल्यानंतर हे आशा भोसलेचे पुनर्पदार्पण असेल, अशी प्रतिक्रिया स्वतः आशाजींनीच दिली. आशाजींसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला नशिबवान समजतो, असेही अनू मलिक म्हणाले. विद्या बालन, इला अरुण, गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित 'बेगम जान' येत्या १४ एप्रिलला प्रदर्शित होईल.